कवठे येमाई दि. ०९ (प्रतिनिधी) – निसर्गाच्या बदलत्या परिस्थितीनुसार वातावरणात देखील सातत्याने बदल होत असल्याने याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झालेला दिसून येत आहे. व्यसन, अयोग्य आहार,योग्य त्या व्यायामाची कमतरता आणि तयार खराब हवामान याचा लोकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. जीवनमान बदलत असून रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्याने अनेक आजारांना बळी पडावे लागत आहे. यातच म्हणजे शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे तीन महिन्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यांना निमोनिया मुळे तर जीव गमवावा लागला नाही ना ? अशी चर्चा नागरीकातून व्यक्त होत आहे.
निमोनिया हा श्वसनमार्गाचा आजार आहे. विषाणू, जीवाणू किंवा बुरशी संसर्गामुळे फुफ्फुसांमध्ये संसर्ग होतो. निमोनियाचा संसर्ग सौम्य किंवा काही प्रकरणांमध्ये जीवघेणा ठरतो. यामध्ये फुफ्फुसातील पेशींना सूज येते. फुफ्फुसात हवेच्या अत्यंत छोट्या-छोट्या पिशव्या असतात. यांना ‘अल्विओली’ असं म्हटलं जातं. यामध्ये जंतू संसर्ग झाल्यामुळे न्यूमोनिया होतो. गंभीर निमोनिया रुग्णामधील लक्षणे… श्वासोच्छवासात अडथळा निर्माण होणं, जोरजोरात आणि कमी श्वास घेणं, हृदयाच्या ठोक्यांचं प्रमाण वाढणं, ताप, अंगात थंडी भरणं आणि खूप घाम येणं, कफ, छातीत दुखणं, उलट्या होणं. याचं निदान योग्यवेळी आणि उपचार तात्काळ सुरू होणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
डॉ. दामोदर मोरे – तालुका वैद्यकीय अधिकारी,शिरूर
“वृद्ध, प्रौढ, लहान मुले, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती आणि इतर वैद्यकीय समस्या असलेल्या लोकांवर परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. चांगल्या आरोग्याच्या सवयी निमोनियाशी लढा देऊ शकतात. यामुळे आजार अंगावर न काढता लक्षणे दिसल्यास नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ तपासणी करून योग्य उपचार करून घ्यावेत त्यामुळे निमोनिया ला सहज घेऊ नका असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.”
निमोनिया ला सहज घेऊ नका – वेळेत उपचार न घेतल्यास जीव गमवण्याची शक्यता – टाकळी हाजीत तीन महिन्यात तीन रुग्णांचा निमोनिया मुळे मृत्यू ?
Leave a comment