जादूटोण्याच्या संशयातून अमानुष मारहाण, दोघांना नाल्यात जिवंत जाळलं; घटनेने गडचिरोली हादरलं

Khozmaster
1 Min Read

गडचिरोली: जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना काही गावकऱ्यांनी मिळून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. १ मे रोजी राज्यात सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा केला जात असताना गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातील बार्सेवाडा येथे रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

जमनी तेलामी (५२), देऊ आतलामी (६०) अशी मृतांची नावे असून याप्रकरणी १५ जणांना अटक करण्यात आली आहे. एटापल्ली तालुक्यातील बार्सेवाडा येथील जमनी आणि देऊ हे दोघे जादूटोणा करीत असल्याचा संशय काही गावकऱ्यांना होता. १ मे रोजी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास गावकऱ्यांनी एकत्र येत दोघांना अतिशय निर्दयीपणे मारहाण केली. त्यानंतर मरणासन्न अस्वथेत असलेल्या दोघांना ओढत नेत रात्री १० वाजतादरम्यान गावाबाहेरील नाल्यात पेटवून दिले. दुसऱ्या दिवशी उशीरापर्यंत याविषयी कुणालाच माहिती नव्हती.दरम्यान, एटापल्ली पोलिसांना कुणकुण लागताच त्यांनी तपासाची चक्रे फिरवून गुन्ह्याचा उलगडा केला.घटनास्थळी दोघांच्या मृतादेहांचा कोळसा झाला होता. याप्रकरणी गावातील एकूण १५ जणांना अटक करण्यात आली असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *