मराठा आंदोलनाच्या नावाखाली तब्बल 100 कोटी उकळल्याचा संशय मनोज जरांगेंनी व्यक्त केला आहे. याच मुद्द्यावरून मनोज जरांगेंनी थेट शंभूराज देसाईंकडेच चौकशीची मागणी केली आहे.
माझं नाव सांगून ज्यांनी पैसे आणि कामं घेतली त्याची मला यादी द्या, अशी मागणी जरांगेंनी शिष्टमंडळाकडे केली आहे. दरम्यान, माझ्या कानावर 100 कोटींचा आकडा आलाय. वेळ आल्यावर त्या माणसाचं नावही घेणार असल्याचा थेट इशारा जरांगेंनी दिला, त्यामुळे नेमके 100 कोटी कुणी कमावलेत या चर्चांना उधाण आलंय.
दरम्यान गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेलं जरांगेंचं उपोषण त्यांनी मागे घेतलं आहे. राज्य सरकारकडून मंत्री शंभूराज देसाई, राणा जगजितसिंह आणि खासदार संदिपान भुमरे यांनी जरांगेंची भेट घेतली. मनोज जरांगे यांनी तब्येतीची काळजी घ्यावी आणि मराठा आरक्षणावर निर्णय घ्यायला एक महिना वेळ द्यावा अशी विनवणी यावेळी शंभुराज देसाई यांनी केली.
जरांगेंनी देसाईंची विनंती मान्य करत सरकारला 13 जुलैपर्यंतची वेळ दिली आहे. सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसंबंधी सरकारची मानसिकता नाही हे जरांगेंनी डोक्यातून काढून टाकावं, शिंदे साहेबांनी त्यांना शब्द दिला आहे, असं शंभुराज देसाई यांनी सांगितलं. मात्र, जर सरकारने एक महिन्याच्या आत मागण्या मान्य केल्या नाही तर विधानसभा लढणार असल्याचा इशारा जरांगेंनी सरकारला दिला आहे.
काय आहेत जरांगेंच्या मागण्या?
सगेसोयरेची तातडीनं अंमलबजावणी करा
कुणबी आणि मराठा एकच मान्य करा
मराठ्यांना ओबीसीतून सरसकट आरक्षण द्या
नोंदी सापडलेल्यांच्या सोयऱ्यांनाही सरसरकट कुणबी प्रमाणपत्र द्या
मराठा आंदोलकांवर दाखल सर्व गुन्हे मागे घ्या
नोंदी नसलेल्यांकडून शपथपत्र लिहून कुणबी प्रमाणपत्र द्या
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मोफत करा
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतिगृह बांधा
मराठा आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करु नका
SEBC अंतर्गत 2014 च्या नियुक्त्या त्वरित द्या
Users Today : 20