सिंदखेडराजा : (एशिया मंच न्युज)
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी कालपासून मातृतीर्थ सिंदखेडराजात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची १००% नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यासह शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तुपकर अन्नत्याग करीत आहेत. हे आता आंदोलन व्यापक होण्याची चिन्हे दिसत आहेत. रविकांत तुपकर यांची हटके आंदोलनाची स्टाईल पाहता तुपकर आता पुढे नेमका काय पवित्रा घेणार याकडे शेतकऱ्यांसह प्रशासनाचे, पोलीस यंत्रणांचे देखील लक्ष लागून आहे. त्यामुळे रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.
याच प्रयत्नांचा भाग म्हणून काल सायंकाळी उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, तहसीलदार, पिकविमा कंपनीचे अधिकारी, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी रविकांत तुपकर यांना भेटायला आंदोलनस्थळी आले. आपण आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती अधिकाऱ्यांनी तुपकरांना केली. मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होवून अंमलबजावणी सुरू होत नाही तोपर्यंत अन्नाचा कण देखील घेणार नाही, असे तुपकर यांनी अधिकाऱ्यांना ठणकावले. यावेळी तुपकर यांनी प्रश्नांची सरबत्ती केल्याने अधिकारीही निरुत्तर झाले.
पिकविम्याच्या प्रश्नांवर तुपकरांनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. सरकारने पिकविमा कंपनीला रक्कम दिली आहे. मात्र तरीही पिकविमा कंपनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करत नाही. त्यामुळे तुम्ही पिकविमा कंपनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करत नाही. त्यामुळे तुम्ही पिकविमा कंपनीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा का दाखल करीत नाही..? असा सवाल तुपकरांनी केला. या प्रश्नांचे उत्तर अधिकाऱ्यांकडे नव्हते.
Users Today : 134