महावितरणने भारनियमन बंद करण्याची नंदकिशोर मापारी यांची मागणी
आपत्कालीन भारनियमनाच्या नावाखाली शहरासह ग्रामीण भागात महावितरणकडून रात्रीच्या वेळी दोन ते तीन तास वीजपुरवठा बंद ठेवला जात आहे. या सततच्या भारनियमनामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे हे आपत्कालीन भारनियमन तत्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांनी महावितरणकडे केली आहे.
सद्यःस्थितीत पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरात घाण पसरली आहे. त्यामुळे डासांची वाढ होत आहे. त्यामुळे डेंग्यूचे रुग्ण वाढताना दिसत आहे. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा ठप्प होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. लोणार शहर हे जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवरामुळे “अ’ वर्ग पर्यटन स्थळ असून येथे मागील काळात वीज भारनियमन बंद करण्यात आले होते. परंतु, महावितरणच्या मनमानी कारभारामुळे पर्यटन स्थळाच्या याठिकाणीही आपत्कालीन भारनियमनामुळे पर्यटक व नागरिक त्रस्त झाले आहेत. मध्यंतरीच्या काळात भारनियमन सुरू असताना शासनाने पर्यटन स्थळे या भारनियमनामधून वगळली होती. यामध्ये लोणार हे “अ’ वर्ग दर्जा पर्यटनस्थळ, शेगाव आणि सिंदखेडराजाचा समावेश होता. नवीन अधिकाऱ्यांना याबाबत काहीच कल्पना नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शासनाने दखल घेऊन ही स्थळे भारनियमनामधून वगळावीत आणि लोणार येथील आपत्कालीन भारनियमन तात्काळ थांबवण्यात यावे, तसेच लोणार विभागातील रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
Users Today : 4