मतचोरी थांबवण्यासाठी काय पडेल ती किंमत मोजू” — शरद पवारांचा सत्तेवर घणाघाती हल्ला
MNS-MVA चा ‘सत्याचा मोर्चा’ : मतदारयादीतील घोळ आणि मतचोरीविरोधात एकजुटीने लढण्याचा निर्धार
मुंबई, विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत आज महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संयुक्त नेतृत्वाखाली “मतचोरीविरोधातील सत्याचा मोर्चा” काढण्यात आला. या मोर्चात विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी एकत्र येत शासनावर तीव्र हल्लाबोल केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी भाषणात सत्ताधाऱ्यांवर थेट आरोप करत सांगितले की, “खोटेपणा उघड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात, पण खोटं बोलणाऱ्यांना शासनाचं संरक्षण मिळतं. हीच खरी मतचोरी आहे.”
“खोटं उघड केल्यावर गुन्हा दाखल — हे शासनाचं संरक्षण!”
शरद पवार म्हणाले, “काही ठिकाणी नागरिकांनी बनावट आधार कार्ड आणि मतदारयादीतील घोळ याबाबत तक्रारी केल्या. सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान दिल्यानंतर ज्यांनी पुरावे दाखवले, त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाले. म्हणजे खोटं उघड करणाऱ्यांनाच शिक्षा, आणि खोटं करणाऱ्यांना संरक्षण!”
ते पुढे म्हणाले, “याचा अर्थ हा शासन सगळ्यांना संरक्षण देतं आहे. म्हणूनच आता मतदानातील चोरी थांबवण्याची जबाबदारी आपली आहे. आपण स्वतःसाठी काही मागत नाही; फक्त लोकशाहीने दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचे रक्षण करा, एवढीच मागणी आहे.”
“लोकशाही टिकवायची असेल तर एक व्हावं लागेल”
पवार म्हणाले, “विधानसभेच्या निवडणुकांमध्ये झालेले प्रकार लोकांच्या लोकशाहीवरील विश्वासाला धक्का देणारे होते. अनेक ठिकाणी अस्वस्थता आहे. पण आपण संघर्ष करूनही लोकशाही जपणार.”
ते पुढे म्हणाले, “राजकीय मतभेद असू शकतात, पण आता मताचा अधिकार टिकवण्यासाठी आपण सर्वांनी एक व्हायला हवं. आज व्यासपीठावर असलेले सर्व नेते आणि कार्यकर्ते एकमताने सांगतात की — काय पडेल ती किंमत मोजू, पण ही मतचोरी थांबवू!”
संयुक्त महाराष्ट्राची आठवण
भाषणाच्या सुरूवातीला शरद पवार म्हणाले, “आजचा हा मोर्चा मला महाविद्यालयीन काळातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देतो. काळा घोडा परिसरातील ते मोर्चे इतिहास निर्माण करणारे ठरले. आज इथंही तीच ऊर्जा, तीच एकजूट पाहायला मिळते.”
Users Today : 22