मुंबई | प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या घटनेवर अत्यंत भावूक शब्दांत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “हे महाराष्ट्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, हा निव्वळ अपघात असून यामागे कोणतेही राजकारण नाही. शोक अनावर झाल्यामुळे बोलणेही कठीण जात असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. “खरे तर आज मी माध्यमांसमोर येणार नव्हतो,” असे सांगत त्यांनी आपल्या पुतण्याला गमावल्याचे दुःख जड अंतःकरणाने व्यक्त केले.
पवार पुढे म्हणाले, “अजित पवार यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्रासाठी प्रचंड धक्का आहे. निर्णयक्षमता, कर्तृत्व आणि नेतृत्वगुण असलेला नेता आपण गमावला आहे. झालेले नुकसान भरून निघणारे नाही. पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात.”
या घटनेला राजकीय रंग देण्याच्या प्रयत्नांवर नाराजी व्यक्त करत त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “यामागे कोणतेही राजकारण नाही. हा निव्वळ अपघात आहे. याच्या वेदना महाराष्ट्राला आणि आम्हा सगळ्यांनाच आहेत. कृपा करून या दुःखद प्रसंगाला राजकारणाची किनार देऊ नये.”
Users Today : 11