मुंबई ;–
मुंबईसह महाराष्ट्रात थंडीचा कडाका काही दिवस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता, मात्र आता पुन्हा एकदा थंडीची लाट येणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. कोकणात थंडीच्या झटक्याचा इशारा देण्यात आला असून मुंबई आणि उपनगरातील किमान तापमानात किंचित घट होईल. अंदाजानुसार, मुंबईचे कमाल तापमान सुमारे 32 तर किमान तापमान जवळपास 17 अंश सेल्सिअसपर्यंत उतरू शकते.
विदर्भात पुढील काही दिवस कडाक्याची थंडी राहणार असून, नागपूरमध्ये किमान तापमान 9 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. तसेच, गार वारे वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात गारठा कायम राहील, तर पुणे, जळगाव, सातारा, सांगली, नाशिक, सोलापूर आणि कोल्हापूरमध्येही थंडीची लाट जाणवेल. मराठवाड्यात ढगाळ हवामानासह तापमानात घट होण्याची शक्यता असून, पारा किमान 9 ते 11 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला वायूप्रदूषणावर उपाययोजना करण्यास मंगळवारी कडाडून सांगितले. न्यायालयाने स्पष्ट केले की, “वेळीच कठोर पावले उचलली नाहीत तर दिल्लीसारखी परिस्थिती उद्भवेल.” दोन्ही प्रशासनांना बुधवारी ठोस उपाययोजना मांडण्याचे निर्देश दिले आहेत.
यावेळी विमान वाहतुकीवरही परिणाम दिसला. दिल्ली विमानतळावर धुके आणि कमी दृश्यमानतेमुळे मंगळवारी किमान 10 येणारी आणि जाणारी विमानं रद्द करण्यात आली, तर 270 हून अधिक विमानांना विलंब झाला. ‘फ्लाइटरडार 24.कॉम’ नुसार, विलंबाचा सरासरी कालावधी 29 मिनिटांचा होता. विमानतळाचे कामकाज पाहणाऱ्या ‘डायल’ने सांगितले की, “दृश्यमानतेमध्ये सुधारणा होत आहे, मात्र काही ठिकाणच्या उड्डाणांना विलंब होऊ शकतो.
Users Today : 11