मोताळा :
तालुक्यातील तळणी गाव परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या सुमारे एक महिन्याच्या कालावधीत बिबट्याने बकरी व वासरीवर हल्ला करून फडशा पाडल्याच्या घटना घडल्या असून, त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे.
या भागात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असून, तो भक्ष्याच्या शोधात गावाच्या आसपास फिरत असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे तळणी गावातील शेतकरी व नागरिक प्रचंड भयभीत झाले आहेत.
शेतात जाणेही धोकादायक
हिवाळी हंगामातील गहू, हरभरा व मका या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री व पहाटे शेतात जावे लागते. मात्र बिबट्याच्या वावरामुळे अनेक शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. परिणामी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वनविभागाकडे तातडीच्या कारवाईची मागणी
ग्रामस्थांनी अनेक वेळा वनविभागाकडे तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
बिबट्याचा संभाव्य धोका लक्षात घेता —
तातडीने पिंजरा लावावा
रात्रीची गस्त वाढवावी
परिसरात सतर्कता मोहीम राबवावी
अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
सध्या लहान मुले व वयोवृद्ध नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यकपणे घराबाहेर न पडता काळजी घ्यावी, तसेच बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
भक्ष्याच्या शोधात हा प्राणी परिसरात फिरत असल्याची शक्यता असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तळणी गावात बिबट्याचा वावर वाढला; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण वनविभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी
0
9
4
9
7
4
Users Today : 5
Leave a comment