देऊळगाव माळी प्रतिनिधी :
३० जानेवारी, राष्ट्रपिता महात्मा गांधींची पुण्यतिथी आणि हुतात्मा दिन, यंदा देऊळगाव माळी येथील महाकालेश्वर मोक्षधाम स्मशानभूमी परिसरात एक वेगळ्या प्रकारचे भावनात्मक दृश्य पाहायला मिळाले. एका बाजूला बापूंच्या स्मृतींना वंदन, तर दुसरीकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाचे दुःख या संमिश्र वातावरणात सेवानिवृत्त सेवा संघाने प्रत्यक्ष श्रममय श्रद्धांजली अर्पण केली.
सेवानिवृत्त संघाच्या ज्येष्ठ सदस्यांनी केवळ भाषणांवर थांबले नाही, तर स्मशानभूमी परिसरातील कचरा, गवत काढून परिसर चकाचक केला. ही स्वच्छता ही आपल्या लाडक्या जननेत्याला दिलेली कृतीशील मानवंदन ठरली.
शोकसभेचे सूत्रसंचालन करताना संपादक कैलास राऊत यांनी भावनांना साद घातली आणि सेवा संघाचे अध्यक्ष दि.स. अंभोरे यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, “दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या प्रशासकीय व राजकीय पटलावर निर्माण झालेली पोकळी कधीच भरली जाणार नाही. त्यांच्या शिस्तीची आणि नियोजनाची राज्याला नेहमीच आठवण येईल.”
स्मशानभूमीचे आगामी सुशोभीकरण कसे करता येईल याचा आराखडा देखील यावेळी मांडण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त सेवा संघाचे पदाधिकारी नारायण बळी, आश्रूजी मगर, शिवाजी जमदाडे, गजानन बळी, सुधाकर खरात, बळीराम जागृत, जी. के. मगर, किसनराव बळी, शालिग्राम राऊत, भागवत मगर आणि गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
हुतात्म्यांचे बलिदान आणि राष्ट्रपित्याचा स्वच्छतेचा संदेश याला लोकनेत्यांच्या आठवणींची जोड मिळाल्यामुळे देऊळगाव माळी परिसर काल भारावून गेला, असे स्थानिकांनी नमूद केले.
Users Today : 3