नागपूर प्रतिनिधी –
बदलती जीवनशैली, वाढलेला स्क्रीन टाइम, जंकफूडचे अतिसेवन आणि मैदानी खेळांचा अभाव यामुळे शहरातील जवळपास ६० टक्के किशोरवयीन मुले लठ्ठपणाची शिकार होत असल्याची माहिती डॉ. दिनेश सरोज यांनी दिली. ग्रामीण भागात हे प्रमाण सुमारे ४३ टक्क्यांपर्यंत असल्याने ही धोक्याची घंटा असल्याचेही त्यांनी सांगितले.
Adolescent Health Academy, Nagpur चा पदग्रहण सोहळा शनिवार, १४ मार्च रोजी दुपारी ३ वाजता Hotel Tuli Imperial येथे आयोजित करण्यात आला आहे. नव्या कार्यकारिणीच्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
या वेळी मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक व अकादमीचे उपाध्यक्ष डॉ. अविनाश गावंडे, अकादमीचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. दिनेश सरोज, सचिव डॉ. यश बानाईत, माजी अध्यक्ष डॉ. मीना देशमुख आणि डॉ. गिरीश चरडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. यश बानाईत यांनी सांगितले की, किशोरवयीन मुलांमध्ये तुलना करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. पडद्यावर दिसणारे सर्व काही खरे असल्याचे त्यांना वाटू लागते. प्रत्यक्ष आयुष्यात समस्या किंवा अपयश आल्यास ते सहन करण्याची क्षमता कमी होत असून आभासी जगातील ग्लॅमर त्यांना अधिक आकर्षक वाटते. यामुळे मानसिक अस्वास्थ्याची समस्या वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले की, पूर्वी चाळिशीनंतर दिसणारे अनेक आजार आता किशोरवयीन मुलांमध्ये आढळू लागले आहेत. लठ्ठपणा हा केवळ वजनाचा प्रश्न नसून तो अनेक गंभीर आजारांचे मूळ ठरू शकतो. पालकांशी संवाद कमी झाल्याने अनेक मुले आपल्या भावना मोबाइलमध्येच शोधू लागली आहेत आणि त्याचे नकारात्मक परिणाम पुढे दिसू लागले आहेत.
Users Today : 1