डोणगाव, प्रतिनिधी –
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार केवळ डोक्यावर न ठेवता डोक्यात घेऊन त्यांच्या आदर्शानुसार समाजकार्य करणे हिच खरी महाराजांना अभिवादन करण्याची पद्धत आहे, असे प्रतिपादन युवासेनेचे नेते ऋषी प्रतापराव जाधव यांनी केले.
डोणगावकरांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक अखेर साकार झाले आहे. आठवडी बाजारातील मोकळ्या जागेत शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना करण्यात आली असून १२ मार्च रोजी युवासेनेचे नेते ऋषी जाधव यांच्या हस्ते पुतळ्याचा महारुद्राभिषेक व आरती करून अनावरण सोहळा पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून करण्यात आली. त्यानंतर प्रतिमेला औक्षण करून पुष्पवृष्टी व आरती करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांनी “जय शिवराय”, “हर हर महादेव” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने युवक, शिवभक्त आणि नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना ऋषी जाधव यांनी केंद्रीय मंत्री व बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी २५ लाख रुपयांचा निधी जाहीर केला. या घोषणेनंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात आनंद व्यक्त केला.
अनावरण सोहळ्यावेळी आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजराने परिसर उत्साहाने दुमदुमून गेला होता. यावेळी सरपंच शिवचरण आखाडे, माजी सरपंच संजय पाटील आखाडे, अॅड. रामेश्वर पळसकर तसेच परिसरातील महिला, पुरुष आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 0