काबूल –
पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील विविध भागांवर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात ४०० हून अधिक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर संताप व्यक्त होत असून भारतनेही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने पाच ठिकाणांना लक्ष्य करून हवाई हल्ले केले. दहशतवादी अड्डा समजून करण्यात आलेल्या या कारवाईत रुग्णालयावरही बॉम्बहल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. या हल्ल्यानंतर इमारतींना मोठी आग लागली असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर अफगाणिस्तानने कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव वाढलेला असतानाच हा हल्ला झाल्याने परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत निवेदन जारी करत या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. “रुग्णालयासारख्या ठिकाणांवर हल्ला करणे अमानवीय व निंदनीय आहे. अशा कृती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाहीत,” असे स्पष्ट करण्यात आले. तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाने दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही भारताने केली आहे.
या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानमधील अनेक धक्कादायक व्हिडिओ समोर आले असून, निवासी भागांवर झालेल्या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
Users Today : 16