२५ वर्षांनंतर जुन्या आठवणींना उजाळा
संग्रामपूर
तालुक्यातील वरवट बकाल येथील नागेश्वर महाराज विद्यालय येथे सन २००१ च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा २५ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. तब्बल २५ वर्षांनंतर सर्व मित्र एकत्र आल्याने शाळेच्या परिसरात जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. तसेच शाळेतील दिवंगत शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
या मेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे ‘एक तास शाळा’ हा उपक्रम होता. २५ वर्षांपूर्वी ज्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले होते, तीच वर्गखोली फुलांनी सजवून पुन्हा एकदा वर्ग भरविण्यात आला. यावेळी शिक्षक रमेश राजनकर आणि महेश शेकोकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत जीवनातील अनुभव आणि मार्गदर्शन दिले.
कार्यक्रमाला शिक्षण संस्था अध्यक्ष अमित गांधी, मुख्याध्यापक राजपूत, पर्यवेक्षक महेश शेकोकर, शिक्षक जाधव तसेच सेवानिवृत्त शिक्षक निमकडे यांनी मार्गदर्शन केले.
सन २०००–२००१ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांनी या रौप्य महोत्सवी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने पुढील काळात एकमेकांना अडचणीच्या वेळी मदत करण्याचा निर्धार केला. कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व शिक्षकांचा फेटा बांधून व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तसेच माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला स्मृतिचिन्ह देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन माजी विद्यार्थिनी भाग्यश्री दामधर आणि वंदना बकाल यांनी केले.
या कार्यक्रमाला विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील सेवानिवृत्त तसेच कार्यरत शिक्षक, कर्मचारी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 36