अकोला – प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला यांच्या अंतर्गत अकोला/ वाशिम/ बुलढाणा जिल्ह्यांतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना राबविण्यात येत आहे. या योजनेद्वारे इयत्ता १२ वी नंतर दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या व्यावसायिक व तांत्रिक अभ्यासक्रमासाठी तसेच महानगरपालिका, विभागीयस्तर, जिल्हास्तर आणि तालुकास्तरापासुन पाच कि.मी. परिसरामध्ये स्थापित महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना लाभ दिला जातो. त्यानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी (२०२२-२३) पात्र विद्यार्थ्यांकडून दि.३१ ऑक्टोंबर पर्यंत ऑनलाईन दस्तऐवज अपलोड करुन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन भरलेला अर्ज व अपलोड केलेले दस्ताऐवज ऑफलाईन कॉलेज मार्फत कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे.
अटी व शर्ती :
विद्यार्थी/ विद्यार्थिनी हे अनुसूचित जमाताचे असावे,जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. पालकाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा अडीच लाखाचे आत असणे आवश्यक.विद्यार्थ्याचे स्वतःचे राष्ट्रीयकृत बॅंकेत खाते असणे बंधनकारक आहे व खाते आधार कार्डशी सलंग्न असावे.विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या, तालुक्याच्या ठिकाणी असेल अशा शहरात विद्यार्थ्याचेपालक रहिवासी नसावेत. विद्यार्थी इ. १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा तथापि एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त ७ वर्ष या योजनेचा लाभ घेता येईल. विद्यार्थ्याचे कमाल वय २८ वर्षापेक्षा अधिक नसावे. विद्यार्थ्याची संस्थेमधील / महाविद्यालयातील उपस्थिती ८० टक्के पेक्षा अधिक असणे आवश्यक.महाविद्यालय हे मान्यताप्राप्त असावे, विद्यार्थ्याने आदिवासी विकास विभागाच्या संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन अर्ज करून – जातीचा दाखला, जात पडताळणी प्रमाणपत्र, तहसिलदाराचा उत्पनाचा दाखला, आधारकार्ड, प्रवेश पावती/बोनाफाईड, मागील वर्षाची मार्कशिट, राष्ट्रीयकृत बॅंकेचे खाते बुक आधारसलग्न असलेले हे मुळदस्ताऐवज स्कॅन ऑनलाईन अपलोड करणे बंधनकारक आहे. महाविद्यालयाने विद्यार्थ्याने भरलेला ऑनलाईन अर्ज विहित दस्ताऐवजांची पडताळणी करून ऑनलाईन व हार्डकॉपी प्रकल्प अधिकारी कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यास आदिवासी विकास विभागाच्या, सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधीत शैक्षणिक संस्थेच्या वसतीगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी, व्यवसाय करत नसावा. एका शाखेची पदवी मध्येच सोडुन दुसऱ्या शाखेच्या पदवीसाठी प्रवेश घेतल्यास किंवा एका शाखेची पदवी/ पदव्युत्तर अभ्यासक्रम पुर्ण झाल्यानंतर इतर शाखेच्या पदवी/ पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही. केंद्र शासनाच्या पोस्ट बेसिक मॅट्रीक शिष्यवृतीकरीता निश्चीत करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेतंर्गत लाभ देण्यात येईल. दोन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही. विद्यार्थ्याने त्याचे स्वयंघोषणापत्र व वडीलांचे घोषणापत्र ऑनलाईन व हार्डकापी सादर करणे बंधनकारक राहील.या योजनेमध्ये विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांनी फसवणुक केल्याचे आढळल्यास संबंधीत विद्यार्थी व शैक्षणिक संस्था कायदेशिर कारवाईस पात्र राहील.
तरी पात्र विद्यार्थ्यांनी आपले अर्ज आधी ऑनलाईन व नंतर ऑफलाईन पद्धतीने आपापल्या महाविद्यालयात सादर करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे यांनी केले आहे.
Users Today : 11