मुंबई –
जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे इंधन दरात वाढ झाली असून, त्याचा थेट परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर होत आहे. या पार्श्वभूमीवर एसटी बसच्या तिकीट दरवाढीची शक्यता निर्माण झाली असून परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांनीही त्याबाबत संकेत दिले आहेत.
मंत्रालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक Dr Madhav Kusekar यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत डिझेल दरवाढीमुळे महामंडळावर वाढणाऱ्या आर्थिक भाराचा आढावा घेण्यात आला. सध्या एसटी महामंडळाला दररोज सरासरी १०.८७ लाख लिटर डिझेलची आवश्यकता भासते. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमार्फत पुरवठा होणाऱ्या डिझेलचा दर मागील आठवड्यात प्रति लिटर ८८.२१ रुपये होता, तो आता वाढून ९१.३१ रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे प्रति लिटर ३ रुपये १० पैशांची वाढ झाली आहे.
या वाढीमुळे महामंडळाला दररोज सुमारे ३३ लाख ७० हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत असून, मासिक स्तरावर हा खर्च सुमारे १० कोटी रुपये तर वार्षिक स्तरावर तब्बल १२४ कोटी रुपयांपर्यंत जाणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, वाढत्या इंधन खर्चामुळे प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगण्यात आले असले तरी तातडीने भाडेवाढ करण्यात येणार नसल्याचेही परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाची मान्यता मिळाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, एप्रिल २०२६ महिन्यात एसटी महामंडळाला सुमारे ७६ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळे भविष्यात आर्थिक संतुलन राखण्यासाठी भाडेवाढीचा निर्णय आवश्यक ठरू शकतो.
तथापि, सर्वसामान्य प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडावा यासाठी शासन विविध पर्यायांचा विचार करीत आहे. इंधन बचत, ई-बसचा वाढता वापर, खर्च नियंत्रण आणि महसूलवाढीच्या उपाययोजनांवर विशेष भर दिला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एसटी ही अत्यावश्यक सार्वजनिक वाहतूक सेवा असून सेवा अबाधित ठेवत आर्थिक संतुलन राखणे हेच महामंडळासमोरील मोठे आव्हान असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Users Today : 9