‘एल निनो’ या हवामानातील बदलामुळे यंदा अमरावती जिल्ह्यात कमी पाऊस, तापमानात वाढ आणि जलस्रोतांवर ताण निर्माण होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शेतकरी बांधव आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, संभाव्य दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः पावसाच्या सुरुवातीला पेरणीची घाई न करता किमान १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अपुऱ्या पावसामुळे दुबार पेरणीची वेळ येऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी संयम बाळगावा.
तसेच पाणी साठवणूक, ठिबक व तुषार सिंचनाचा वापर, जनावरांसाठी चारा व्यवस्थापन आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करून जलसंधारण उपक्रमांना सहकार्य करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हा प्रशासनाने कृषी विभाग, महसूल विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून हवामान खात्याच्या पुढील अंदाजानुसार आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत.
