ता. प्रतिनिधी :
लोणार नगरपालिकेची निवडणूक पार पडली… जनतेने आपला कौल दिला… काही उमेदवार विजयी झाले, तर काहींना पराभव स्वीकारावा लागला. विजयी उमेदवार विकासकामांच्या नियोजनात व्यस्त असल्याचे दिसत आहे, तर अनेक पराभूत उमेदवार शांतपणे आपल्या दैनंदिन कामधंद्याकडे वळल्याचे चित्र आहे.
मात्र सध्या लोणारच्या राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगताना दिसत आहे. ही चर्चा कोणत्याही विजयी किंवा पराभूत उमेदवारांवर नसून, राजकारणाभोवती सतत फिरत स्वतःलाच प्रत्येक घडामोडीचं केंद्र समजणाऱ्या काही मंडळींवर असल्याचे बोलले जात आहे.
जनतेमध्ये सध्या एक म्हण चांगलीच गाजताना दिसत आहे — “बैलगाडी मालकाची… बैल गाडी ओढतात… पण खाली धावणारं कुत्रं मात्र ‘गाडी माझ्यामुळेच चालते’ या आवेशात गावभर धुरळा उडवत फिरत आहे!”
चहाच्या टपऱ्यांपासून गल्लीबोळांपर्यंत आता मिश्कील चर्चांना उधाण आले आहे — “नेते कामात व्यस्त… जनता संसारात व्यस्त… पण काही बैलगाडीखालची कुत्री अजूनही स्वतःलाच राजकारणाचं इंजिन समजतायत!”
विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परिसर, भागवत चित्रमंदिर समोरील श्याम भाऊ शिंदे यांची लॉन्ड्री, कबीर भाईजी हॉटेल तसेच शहरातील अनेक चौक-चहाटळांवर याच राजकीय चिमट्यांच्या चर्चेला उधाण आल्याचे बोलले जात आहे.
लोणारकर आता हसत हसत म्हणताना दिसत आहेत — “निवडणूक संपली… निकाल लागला… आता तरी बैलगाडीखालचं कुत्रं स्वतःच्या कामधंद्याला लागणार का?”
सध्या लोणार नगरीत या राजकीय टोमण्यांची, मिश्कील चिमट्यांची आणि उपरोधिक चर्चांचीच जोरदार हवा रंगताना दिसत आहे.
