चिखली
नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे महाविकास आघाडीतर्फे आयोजित कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मोर्चादरम्यान महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ चिखली येथे भारतीय जनता पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात आयोजित या आंदोलनात भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत संबंधित वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना, सार्वजनिक जीवनातील व्यक्तींविषयी अशा प्रकारची भाषा वापरणे हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नसल्याचे म्हटले. लोकशाही व्यवस्थेत मतभेद असू शकतात; मात्र राजकीय टीका करताना सभ्यता आणि मर्यादा पाळल्या गेल्या पाहिजेत, असे मतही व्यक्त करण्यात आले.
तसेच पंतप्रधानपद हे देशाच्या लोकशाही व्यवस्थेचे प्रतीक असून त्या पदाचा सन्मान राखला गेला पाहिजे, असे सांगत काँग्रेस पक्षाने या प्रकरणी भूमिका स्पष्ट करावी आणि संबंधित वक्तव्याबाबत जनतेची माफी मागावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
यावेळी भाजपाचे विविध मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
