नांदुरा प्रतिनिधी:-माणूस शिक्षणामुळे माणूस बनतो,सर्वच महापुरुषांनी शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेत त्या-त्या काळात शैक्षणिक क्रांती केली.ज्या समाजात शिक्षणाचा अभाव आहे त्या समाजात अंधश्रध्दा,धर्मांधता ,जातीभेद या दुर्गुणांचा गंभीर प्रभाव राहतो यामुळे देशाचे भविष्य असलेला युवा वाममार्गाला जाऊ शकतो.जर आपण सरकारी शाळा बंद केल्या तर या महागाईच्या काळात जिथं जगणं कठीण झाले आहे तिथं पालक आपल्या पाल्याला खाजगी शाळेतील महागडे शिक्षण नाही देऊ शकणार.यामुळे या देशाचे भविष्य हे अशिक्षित राहील.म्हणून २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सरकारी शाळा बंद न करता उलट या शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढवा तसेच त्या शाळा आधुनिक करा व पालकांना विश्वास द्या की तुमचा पाल्य इथ शिकुनही मोठ्या हुद्यावर जाऊ शकतो.यामुळे सरकारी शाळेकडे पालकांचा कल वाढून विद्यार्थी संख्या वाढेल हे निश्चित…० ते २० विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याची कार्यवाही करण्याचे जे निर्देश देण्यात आले आहे ते तत्काळ मागे घ्यावे. जे महात्मा ज्योतिराव फुले यांनी हंटर कमिशन समोर मांडले होते. व छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात त्याची अंमलबजावणी केली होती. तेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून मांडले असून RTE अॅक्ट 2009 नुसार बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण हक्काची तरतूद आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणात वस्ती तेथे शाळा हे धोरण शासनाने अवलंबले आहे.त्यानुसार वस्ती,पाडे,तांडे,वाड्या अशा दुर्गम भागात शाळा सुरु करण्यात आलेल्या होत्या.त्यामुळे निश्चितच शाळाबाह्य विद्यार्थी प्रमाण कमी झाले आहे. कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांचे प्रमाण अतिशय दुर्गम तसेच वाडी,वस्ती, तांडे व आदिवासी बहुल क्षेत्रात अधिक आहे.या शाळा बंद झाल्यास तेथील मुलांच्या व विशेषत: मुलींच्या शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होऊन ते कायमचे शिक्षण प्रवाहापासून दूर लोटले जातील करण काही आदिवासी भागात पक्के रस्ते नाहीत. गाव, वस्तीच्या बाजूला नद्या, नाले असल्यामुळे पावसाळ्यात या भागाचा अनेक दिवस संपर्क तुटतो. कुठलेही दळणवळणाची साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे या बाबीचा गांभिर्याने विचार करावा असे निवेदन संभाजी ब्रिगेड नांदुराच्या वतीने नांदुरा तहसील मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.यावेळी संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील,तालुका संपर्कप्रमुख सचिन गणगे,तालुका कार्याध्यक्ष संतोष सोळंके,नांदुरा शहर उपाध्यक्ष कुलदीप डंबेलकर, इसापूर शाखा सचिव मधुसूदन पुंडकर,सागर वाघमारे, आसिम खान व इतर उपस्थित होते
Users Today : 1