मुर्तिजापुर – कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजने अंतर्गत सामाजिक न्याय विभागातर्फे दारिद्रय रेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतमजूरांना जमिन दिली जाते. या योजनेसाठी लाभार्थ्यांना द्यावयाच्या जमिनींसाठी खाजगी शेतकऱ्यांकडून जमिन खरेदी करण्यासाठी वा लाभार्थ्यांना जमिन देण्यासाठी कोणत्याही बाह्यव्यक्तीची नेमणूक केलेली नाही. तरी शेतजमिन विक्री करणारे शेतकरी व लाभार्थी यांनी अशा व्यक्तिंपासून सावध राहण्याचा इशारा दिला असून अशा व्यक्तिंच्या अमिषाला बळी पडू नये असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.
या योजनेसाठी शेतजमिन विक्री करणाऱ्या मालकाने जमिन विक्रीचा प्रस्ताव स्वतः कार्यालयात द्यावयाचा आहे.अशा द्यावयाच्या जमिनींसाठी स्वतः शेतमालकाने सातबारा उतारा व मुल्यांकन घेऊन कार्यालयास संपर्क साधावयाचा आहे. त्यानंतर आपली जमिन विक्रीसाठी विहित कागदपत्रासह स्वतः अर्ज करावयाचा आहे. जमिन मालकाने स्वतः प्रस्ताव कार्यालयात सादर करावयाचा आहे. तसेच लाभार्थ्यांनीही शेती प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर संबंधित गावाच्या ग्रामपंचायतीतून अनुसूचित जाती भुमिहीन पात्र लाभार्थ्यांचे अर्ज व अहवाल घेतला जाईल. लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या कार्यालयात परस्पर अर्ज करु नये. तसेच कोणत्याही बाह्यव्यक्तीच्या अमिषाला बळी पडू नये. अशा प्रकारे कोणत्याही बाह्यव्यक्तीशी या कार्यालयाचा संबंध नसून बाह्यव्यक्तीद्वारे जमिन मालक वा लाभार्थी यांची फसवणूक झाल्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही. तरी बाह्यव्यक्तिंपासून सावध रहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.
Users Today : 23