विनोद वसु अकोट ता प्रतिनिधी गेल्या कित्येक महिन्यापासून अकोट ते पाटसुल मार्गे अकोला रेल्वेचे काम पूर्णत्वास गेले असून सुध्दा अद्यापही रेल्वे सुरू करण्यात आली नाही. गांधीग्राम येथील पुर्णा नदीवरील पुल नादुरूस्त झाल्यामुळे या मार्गे एस. टी. बसेस बंद आहेत. परिणामी नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सदर रेल्वे त्वरीत सुरू करण्यात यावी अशी मागणी खारपाणपट्ट्यातील गावकऱ्यांनी केली आहे.लाखो रूपये खर्च करून अकोटसह पाटसुल रेल्वे स्टेशन सुसज्ज करण्यात आले आहे. परंतु गेल्या तीनचार वर्षापासुन या स्टेशनवरून रेल्वे धावलेली नाही. दरम्यान गांधीग्राम येथील पुलाच्या समस्येने अकोलाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला. त्यामुळे या रेल्वे स्टेशनवरुन रेल्वे सुरू करण्याची मागणी खारपाणपट्यातील नागरीक करीत आहेत. गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील पुल नादुरूस्त झाल्यामुळे अकोलाकडे एसटी व इतर वाहनांव्दारे होणारा प्रवास थांबला. ग्रामीण भागातून अकोला येथे जाणाऱ्या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. शेगाव, दर्यापुर, म्हैसांग मार्गे अकोला येथे जाता येते. परंतु या प्रवासासाठी भाड्यापोटी रक्कम सुध्दा जास्त मोजावी लागते. त्यामुळे अकोला येथे जाणेयेणे आता गोरगरिब लोकांना परवडणारे नाही. दिवाळी सण तोंडावर आला असून लेकीबाई दिवाळीत आपल्या माहेरी येतात. परंतु नादुरूस्त पुलामुळे अकोला मार्ग बंद झाला. परिणामी लेकीबाईंसह नागरिकांना अनेक समस्या भेडसावनार आहेत. पाटसुल रेल्वे स्टेशन अंतर्गत अनेक गावे जोडलेली असुन रेल्वे सुरू झाल्यास या गावातील गोरगरिब जनतेला याचा लाभ मिळणार आहे. याकडे रेल्वे विभागाने लक्ष देवून पाटसुल रेल्वे स्टेशनवरून अकोला करीता त्वरीत रेल्वे सुरू करावी अशी मागणी वरुर जऊळका, खापरवाडी, लोतखेड, विटाळी, देवरी, रौंदळा येथील जनता करीत आहे.
Users Today : 20