प्रतिनिधी , अशोक भाकरे
अकोला जिल्ह्यात जून ते ऑगस्ट मध्ये झालेली अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेती व फळपिकांच्या तसेच शेतजमिनीच्या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाने १४० कोटी ५० लक्ष ८३ हजार रुपयांचे अनुदान मंजूर केले असून त्यापैकी ६१ हजार ६३४ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात ६४ कोटी ४० लक्ष १९ हजार रुपये जमा झाले असून उर्वरित निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरु असून ही कार्यवाही यंत्रणेने दिवाळीपूर्वी पूर्ण करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे दिले.
जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीपोटी त्यांना भरपाई म्हणून अनुदान मंजूर झाले आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात दिवाळीपूर्वी वितरीत व्हावे, यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज आढावा घेतला. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सर्व तहसिलदार उपस्थित होते. या बैठकीत माहिती देण्यात आली की, जून ते ऑगस्ट २०२२ मध्ये शेतीचे झालेले नुकसानीचे एकूण बाधीत क्षेत्र हे ९८३२१.८४ हेक्टर इतके असून १ लाख २० हजार २३९ शेतकऱ्यांची संख्या आहे. तर शेतजमिन खरडून गेलेले क्षेत्र १७२४.४० हेक्टर असून शेतकऱ्यांची संख्या २१२६ आहे. पिकांच्या नुकसानीबाबत भरपाई म्हणून १३४ कोटी चार लक्ष १८ हजार रुपये इतके अनुदान जिल्ह्यास प्राप्त झाले. तर शेतजमिन खरडून गेल्या पोटी ६ कोटी ४६ लक्ष ६५ हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले, असे एकूण १लाख २२ हजार ३६५ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १४० कोटी ५० लक्ष ८३ हजार रुपये इतके अनुदान प्राप्त झाले आहे. हे अनुदान तालुका यंत्रणेमार्फत वितरीत करण्यात येत असून सद्यस्थितीत (दि.१९ अखेर) १०६ कोटी ११ लक्ष ६७ हजार रुपयांचे देयके कोषागारात सादर झाली आहेत. त्यापैकी ६१ हजार ६३४ शेतकऱ्यांच्या खात्यात ६४ कोटी ४० लक्ष १९ हजार रुपयांची रक्कम जमा झाली आहे. उर्वरित रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी सर्व तहसिलदारांना दिले आहेत.
Users Today : 20