हिंगोली – नांदेड समृद्धी महामार्ग जोडणीसाठी “अ” प्रमाणे प्रस्ताव सादर करा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एमएसआरडीसीला विभागाला सुचना
हिंगोली दि. १३ वार्ताहार – हळदीचे सर्वाधिक उत्पन्न घेणारा जिल्हा म्हणून हिंगोली जिल्ह्याची शासन दरबारी नोंद आहे. परंतू विकासाच्या बाबतीत हिंगोली जिल्हा इतर जिल्ह्याच्या तुलनेत खुप मागे आहे. जिल्ह्याचा मागासलेपणा दूर करण्यासाठी झपाट्याने विकास होणे अपेक्षित आहे. नांदेड – हिंगोली समृद्धी महामार्ग जोडला गेल्यास हा विकास लवकर साध्य होईल त्यामुळे नांदेड – हिंगोली समृद्धी महामार्ग जोडण्यात यावा अशी खासदार हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्या मागणीचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन यावर तोडगा काढला जाईल असे आश्वासन खासदार हेमंत पाटील यांना दिले आहे त्यामुळे खासदार हेमंत पाटील यांच्या मागणीला यश आले आहे.
खासदार हेमंत पाटील यांनी गुरुवारी (दि.१०) मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन वरील मागणी केली होती. त्यानंतर कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या निवेदनाची तात्काळ दखल घेत नांदेड – हिंगोली समृद्धी महामार्ग जोडण्यासाठी एमएसआरडीसी व संबंधित विभागास सुचना करुन अ प्रमाणे प्रस्ताव सादर करण्याच्या आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना शेतात पिकवलेला कच्चा माल मुंबई, पुणे, हैदराबाद, तेलंगणा, कर्नाटक, गोवा, गुजरात, बेंगलोर अशा मोठ्या शहरात सहज घेऊन जाता येणे शक्य होणार आहे. शेतीतला माल योग्य वेळी योग्य ठिकाणावर पोहचल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात मोठी भर पडणार आहे.
कोट
हा समृद्धी महामार्ग नसून तो शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणारा महामार्ग आहे
एखादा जिल्हा विकासाच्या बाबतीत मागे राहतो तेव्हा सर्वात पहिले लोकप्रतिनिधींकडे बोट दाखवले जाते. हिंगोली लोकसभा मदतार संघाचा खासदार म्हणून जनतेने मला सेवा करण्याची संधी दिली, तेव्हा पासून जिल्ह्याच्या विकासाकरिता भरीव योगदान देण्यासाठी मी काम करत आहे. त्यामुळेच आज हिंगोली जिल्ह्यात हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र व भेंडेगाव येथे ड्रायपोर्ट असे दोन महत्वकांक्षी प्रकल्प मार्गी लागले आहेत. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरघोस निधी उपलब्ध करुन दिला आहे. या दोन प्रकल्पामुळे जिल्हासह मराठवाड्यातील होतकरु उच्चशिक्षित तरुणांना रोजगारांच्या नव्या संधी उपलब्ध होतील. आज मुंबईला सारख्या मोठ्या शहरात जाण्यासाठी १२ ते १४ तास लागतात समृद्धी महामार्ग जोडला गेला तर तेच अंतर सहा ते सात तासांवर येईल व आपल्या भागातील हळद जगभरात वेगाने पाठवण्यात देखील या समृद्धी महामार्गाची महत्वाची भूमिका असेल. यातून जिल्ह्याचा विकास झपाट्याने होईल यात तिळमात्र शंका नाही.
Users Today : 54