रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलनशहर प्रतिनिधी बालाजी मोरे सोयाबीन – कापूस उत्पादकांच्या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी थेट अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांची फौज आता मुंबईत धडकणार असून काळ्यामातील हे कास्तकार मुंबई हादरवून सोडण्यासाठी सज्ज झाले आहेत, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष दामुअण्णा इंगोले यांनी केले आहे. त्यांच्या नेतृत्वात २२ नोव्हेंबर रोजी हजारो शेतकरी बुलढाण्याकडे रवाना झाले असून २३ नोव्हेंबर रोजी बुलढाण्यातून मुंबईकडे कूच करणार आहेत.दरम्यान शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, सोयाबीनला किमान ८ हजार ७०० रुपये आणि कापसाला १२ हजार ७०० रुपये भाव स्थीर रहावा यासाठी सोयापेंड (डीओसी) नियार्तीला प्रोत्साहन द्यावे, मागील वर्षी आयात केलेल्या ५ लाख मेट्रिक टन सोयापेंडला डिसेंबरपर्यंत दिलेली मुदतवाढ रद्द करावी, सोयापेंड आयात करु नये, सोयाबीनची वायदे बाजारावरील बंदी उठवावी, खाद्य तेलांवरील आयात शुल्क ३० टक्के करावे, कापसाचे आयात शुल्क पूर्वीप्रमाणे ११ टक्के ठेवावे, कापूस व सूत नियार्तीला प्रोत्साहन द्यावे यासह इतर मागण्यांसाठी सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर यांनी आंदोलन पुकारले आहे. ६ नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात रेकॉर्ड ब्रेक मोर्चा निघाला होता, हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरुन आपला रोष व्यक्त केला. परंतु या मोर्चानंतरही शासनाने ठोस भूमिका न घेतल्याने रविकांत तुपकर यांनी थेट मुंबई येथे अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा गंभीर इशारा दिला आहे. त्यानुसार ‘स्वाभिमानी’चे विदर्भ अध्यक्ष दामुअण्णा इंगोले यांनी देखील वाशीम जिल्ह्यात कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन, शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना आंदोलनासाठी प्रोत्साहीत केले आहे. २२ नोव्हेंबरच्या रात्री दामुअण्णा इंगोले यांच्या नेतृत्वात वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फौज बुलढाण्याकडे रवाना झाली आहे. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलढाण्यातील स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर येथून हजारो शेतकऱ्यांच्या वाहनांचा ताफा मुंबईकडे रवाना होणार असून २४ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे मंत्रालया शेजारी मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटीवरुन अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन करणार आहेत. या पार्श्वभूमिवर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच तुपकरांना नोटीस बजावली आहे. परंतु अशा कितीही नोटीस आल्या तरी मागे हटणार नाही, असा पावित्रा तुपकरांनी घेतला आहे. तुपकरांच्या नेतृत्वात वाशीमची फौज देखील या आंदोलनात पूर्ण ताकदीने सहभागी होणार आहे. आता माघार नाही, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही आरपारची लढाई लढण्यासाठी निघालो आहे, शेतकऱ्यांची ही फौज मुंबई हादरवून सोडल्याशिवाय शांत होणार नाही, असा इशारा दामुअण्णा इंगोले यांनी दिला आहे.
Users Today : 32