सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
तालुक्यात होणाऱ्या सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका लक्षात घेता दारूच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे . यातून सामाजिक स्वास्थ बिघडण्याची भीती असल्याने या निवडणुका दारूमुक्त होण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग आणि गाव पुढाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे . लग्न , वराती आणि निवडणुका हे दारू कशी घेतली जाते व कशी घ्यावयाची यासाठीचे विनामूल्य प्रशिक्षण केंद्र समजले जाते.या संधीचा फायदा घेत तरुण फुकटची दारू पिऊन सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याचे काम करीत असतात. यामुळे गावागावांत भांडणे, शिवीगाळ यांसारख्या घटना घडतात व कायमस्वरुपी वैरत्व वाढवून गाव दोन गटांत विभागले जाते.काही मुले आयुष्यभर दारूच्या आहारी जाऊन जीवन उद्ध्वस्त करुन घेतात.स्थानिक राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण आहेत.ग्रामीण भागातील राजकारणावर पकड मजबूत करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे.त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्ष या निवडणुकीत प्रामुख्याने आपल्या कार्याचा गाजावाजा करत आहेत. निवडणुका आल्या की सर्वच राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने निवडणुकीची तयारी करतात. गावाच्या विकासासाठी असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका या दारुमुळे भांडण वाढत असल्याचे आजवरचे चित्र आहे. त्यामुळे गावातील जाणत्या लोकांनी तथा राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारूमुक्तीसाठी प्रयत्न करून उपाययोजना करणे गरजेचे आहे. अशी मागणी सोयगाव पंचायत समितीचे माजी सभापती धरमसिंग चव्हाण यांनी केली आहे.
Users Today : 39