१५ दिवसांत होणार निवडणूक प्रक्रिया
योगेश नागोलकार
पातूर

उपसरपंचांची निवड करताना सदस्य म्हणून पहिल्या फेरीत मतदान करण्याचा अधिकार सरपंचाना असणार आहे.मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर दोन्ही गटांना उपसरपंचाला सारखी मते मिळाली तर या प्रकरणात निर्णायक मतदानाचा अधिकार देखील सरपंचांना देण्यात आलेला आहे.यामुळे सरपंचांना निर्णायक परिस्थिती निर्माण झाल्यास दुसऱ्यांना मतदान करता येणार आहे. यातून गाव पातळीवरचा तिढा सुटणार आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने सूचना प्रसिद्ध केले आहे. पातुर तालुक्यातील २८ ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच पार पडल्या ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तापलेले वातावरण थंड झाले असले तरी आता पातूर तालुक्यात गावागावात राजकीय वर्तुळाचे लक्ष उपसरपंच निवडणुकीकडे लागली आहे. या पदासाठी इच्छुक सदस्यांनी फिल्डिंग लावली असली तरी निर्णायक स्थितीत सरपंचाच्या विशेष अधिकाराला महत्त्व असणार आहे. तालुक्यातील उपसरपंचाची निवडणूक प्रक्रिया पुढील १५ दिवसात पार पाडण्याचे राज्य शासनाचे निर्देश आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंचाची निवड थेट जनतेमधून झाली आहे. यामुळे उपसरपंच पदासाठी निवडणुकीची प्रक्रिया ग्रामपंचायत मध्ये पार पाडावी लागणार आहे. यासाठी पहिली सभा ग्रामपंचायत मध्ये घेतली जाणार आहे. त्यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून ग्रॅज्युएट ऑफिसर असणार आहेत. पहिल्या सभेचे अध्यक्ष सरपंच असणार आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून पुन्हा शहानिशा देखील करण्यात आली आहे. त्यानुसार उपसरपंच पदाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी सूचना प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. निवडणूक आटोपल्यानंतर १५ दिवसाच्या आत उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची असते. या संदर्भात जिल्हाधिकारी तारीख ठरवून देतात व त्यानुसार तहसीलदार त्यांच्या तालुक्यात उपसरपंचाची निवडणूक घेतात अशी माहीती आहे. तालुक्यात २० डिसेंबरला मतमोजणी झाली त्यामुळे ५ जानेवारीपर्यंत उपसरपंचांची निवडणूक घेण्यात येणार आहे.
Users Today : 17