रितेश कुमार टीलावत
तेल्हारा प्रतिनिधी. लोकजागर मंचचे अध्यक्ष अनिल गावंडे यांनी मांडलेल्या ग्राम ते शिवग्राम या कल्पनेला सरपंचांनी प्रतिसाद द्यावा व ग्राम ते शिवग्राम स्पर्धेत सहभाग घ्यावा असे प्रतिपादन आदर्श गाव पाटोदाचे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केले.स्थानिक भागवत मंगल कार्यालयात आयोजित अकोट व तेल्हारा तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार व ग्रामपरिषदेत बोलतांना ते पुढे म्हणाले की गाव सुधारणेची सुरुवात सरपंचांनी स्वतःच्या घरापासून करावी.सरपंच जर आपल्या घरातील मय्यत व्यक्तीची रक्षा नदीत सोडत असेल तर लोकं काशीला सोडतील.गावाचा विकास हा आमदार व खासदारांच्या निधीवर अवलंबून नसून तो सरपंचाच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे असे उद्गार त्यांनी ग्रामपरिषदेला उपस्थित सरपंच, उपसरपंच व सदस्यांना संबोधित करतांना काढले.यावेळी साद माणुसकीची फाऊंडेशन पुण्याचे संस्थापक हरिष बुटले यांनी ग्राम विकासाची काही सूत्रे उपस्थितांना समजावून सांगितली तर दैनिक मातृभूमीचे संपादक पुरुषोत्तम आवारे पाटील व ऍड.सुधाकर खुमकर यांनी सुध्दा उपस्थितांना लोकजागर मंचाची भूमिका समजावून सांगत मार्गदर्शन केले. या सत्कार सोहळ्यात नवनियुक्त ४३ गावातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी लोकजागर मंचचा सत्कार स्वीकारला.तर ग्राम परिषदेला दोन्ही तालुक्यातील सरपंचाची भरगच्च उपस्थिती होती. लोकजागर मंचचे अध्यक्ष अनिल गावंडे यांनी सरपंचांनी जर साथ दिली व ग्राम ते शिवग्राम स्पर्धेत सहभाग नोंदवला तर त्या गावांना शासनाचा भरघोस निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन दिले तसेच अकोट व तेल्हारा दोन्ही तालुक्यासाठी प्रथम बक्षीस एक लाख,द्वितीय पन्नास हजार तर तृतीय बक्षीस पंचवीस हजार रुपये जाहीर केले.
यावेळी शंकरराव पुंडकर गुरुजी,संजय अढाऊ,अशोक घाटे,सुरेश ओंकारे, मुन्ना बिहाडे,मितेश मल्ल, रवि घुंगड,निखिल गावंडे,राम मंगळे,प्रा.प्रदीप ढोले,प्रा.सुधाकर येवले इ. उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकजागर मंचचे जिल्हाध्यक्ष मनिष भांबुरकर तर सूत्रसंचालन लोकजागर मंचचे जिल्हा संघटक महेंद्र कराळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकजागर मंचच्या सर्व पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.
ग्राम ते शिवग्राम स्पर्धेला शिवजयंती पासून सुरुवात-अनिल गावंडे
अकोट व तेल्हारा तालुक्यातील ग्राम ते शिवग्राम स्पर्धेला शिवजयंती पासून सुरुवात होईल व ऑगस्ट महिन्यात विजेत्या गावांना रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल यासाठी या स्पर्धेत राजकारण बाजूला ठेवत सहभाग घ्यावा असे आवाहन लोकजागर मंचचे संस्थापक अनिल गावंडे यांनी केले.
Users Today : 4