बुलडाणा, दि. 8 : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या आहारात पौष्टिक तृणधान्य पदार्थांचा वापर वाढविण्यासाठी विद्यार्थी पोषण जागरूकता अभियान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दि. 1 ते 14 ऑगस्ट 2023 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्याचे महत्व पटवून देण्यासाठी व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.
सन 2023-24 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करण्यात येत आहे. सध्याच्या जीवनशैलीत सर्व वयोगटातील लोकांच्या विशेषतः विद्यार्थ्यांच्या आहारातील पौष्टिक तृणधान्याच्या पदार्थांचा वापर कमी होत आहे. जिल्ह्यात पौष्टिक तृणधान्याच्या उत्पादनात वाढ करणे आणि नागरिकांमध्ये पौष्टिक तृणधान्यामधील गुणधर्म याविषयी जागरूकता निर्माण करून दैनंदिन आहारात त्यांचा समावेश करण्यासाठी कृषी आणि सलग्न विभागांच्या सहकार्याने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
ऑगस्ट महिन्यात मिलेट ऑफ द मंथ संकल्पनेनुसार राजगिरा या पिकाकरीता समर्पित आहे. राजगिरा शरीरासाठी अत्यंत गुणकारी असल्याने सूपर फुड म्हणून प्रचलित आहे, ग्लुटेन फ्री, फायबरनी युक्त आहे. त्यामुळे वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. यामध्ये विटामिन सी भरपूर मात्रेत असल्याने त्वचा, केस आणि हिरड्यांच्या विकारांवर उपयुक्त आहे. स्तनदा मातांसाठी दुग्धवाढीकरिता राजगिरा उपयुक्त आहे. राजगिऱ्यामधील रक्तस्थंभक गुणधर्म हा रक्तस्त्राव थांबविण्यास मदत करतो.
राजगिरापासून राजगिरा पराठा तयार करण्यात येतात. यासाठी गव्हाचे पीठ 50 ग्रॅम, राजगिऱ्याची ताजी पाने 10 ग्रॅम, ओवा 1 ग्रॅम, लसन अद्रक पेस्ट अर्धा चमचा, तिखट अर्धा चमचा, हळद, जिरेपूड, कोथींबीर 2 ग्रॅम, चवीनुसार मीठ साहित्य लागते. राजगिऱ्याची पाने व कोथींबीर धुवून चिरून घेणे. पिठामध्ये सर्व साहित्य मिसळून तिंबून घेणे. समान आकाराचे गोळे करून पराठा लाटून घ्यावे. तव्यावर तेल टाकून लाटलेला पराठा दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्यावा. तयार झालेला पराठा दही, चटणी लोणची यासोबत खाता येतो.
राजगिरा दाल फ्राय तयार करण्यासाठी तुरीचे किंवा मुगाचे वरण 1 वाटी, लसून 2 पाकळ्या, बारीक कापलेली राजगिऱ्यांची पाने पाव वाटी, टोमॅटो 10 ग्रॅम, हिरवी मिरची 2 ग्रॅम, जिरे आणि मोहरी 1 ग्रॅम, चवीनुसार मीठ साहित्य लागते. तेल गरम करून जिरे, मोहरी, हिरवी, मिरची, ठेचलेला लसूण आणि टाकून फोडणी तयार करणे. हळद, टोमॅटो, राजगिऱ्याची पाने आणि मीठ टाकून शिजवणे. नंतर शिजलेली डाळ टाकणे आणि टाकून उकळणे. कोथिबीर टाकून वरण खाण्यास देता येते. राजगिऱ्याचे मुटके तयार करण्यासाठी गव्हाचे पीठ 50 ग्रॅम, ज्वारी पीठ 25 ग्रॅम, हरभरा डाळीचे पीठ 25 ग्रॅम, राजगिराच्या पाने 10 ग्रॅम, तिखट अर्धा चमचा, हळद पाव चमचा, ओवा आणि जिरेपुड अर्धा चमचा, चवीनुसार मीठ, कोथिंबीर 2 ग्रॅम साहित्य लागते. राजगिऱ्याची पाने व कोथिंबीर धुवून चिरून घ्यावी. सर्व पीठे आणि उर्वरित साहित्य, तसेच राजगिरा पाने, कोथिंबीर, तेलाचे मोहन आणि पाणी टाकून घट्ट मऊसर पीठ मळून घ्यावे. भिजलेल्या पिठाचे मुटके बनवून घ्यावे. पातेल्यात पाणी घेऊन भिजवलेल्या पिठाचे मुटके बनवून घेणे. पातेल्यात पाणी घेऊन उकळणे. पातेल्यावर स्टीलच्या चाळणीला तेल लावून तयार केलेले मुटके वाफावण्यास ठेवणे. मुटके शिजल्यावर त्यावर आवडत असेल तर मोहरी, जिरे आणि कडीपत्याची फोडणी टाकून दह्याच्या चटणीसोबत गरम खाण्यास देता येते.
Users Today : 47