जगातील विकसित देशांच्या तुलनेत भारतातील बेरोजगारी कमीच; नारायण राणेंनी थेट आकडेवारीच मांडली

Khozmaster
3 Min Read

पुणे: ‘देशात २०१३-१४मध्ये बेरोजगारीचा दर ४.९ टक्के होता. तो आता ३.२ टक्के एवढा कमी झाला असून, अनेक विकसित देशांच्या तुलनेत हा दर कमी आहे,’ असा दावा करून केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ‘राष्ट्रीय रोजगार मेळाव्यातून १० लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे उद्दिष्ट लवकरच गाठले जाईल,’ अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.                                                                                               केंद्र सरकारच्या विविध विभाग व संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या ५१ हजार उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यासाठी अकराव्या ‘राष्ट्रीय रोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. त्यात महाराष्ट्रात ४३७ उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. त्यापैकी १४३ जणांना पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे आयोजित मेळाव्यात नियुक्तीची पत्रे देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मेळाव्याला ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे संबोधित केले. त्यानंतर केंद्रीय मंत्री राणे यांनी देशात रोजगार वाढत असल्याचा दावा केला. केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे पुणे मुख्य आयुक्त राजकुमार, प्रधान आयुक्त संजय महेंद्रू, केंद्रीय सीमा शुल्क विभागाचे पुणे आयुक्त यशोधन वनगे उपस्थित होते.

‘देशसेवेतूनच विकसित भारत’

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश अमृ काळाकडे वाटचाल करीत असून, २०४७पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट गाठणार आहे. विविध सरकारी विभागांत नव्याने भरती होत असलेल्या या अधिकाऱ्यांना देशसेवेतून विकसित भारताचे साक्षीदार होता येईल. सशक्त व आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत प्रत्येकाने योगदान द्यावे,’ असे आवाहन नारायण राणे यांनी केले.

मनोज जरांगेंनी आरक्षणाचा अभ्यास करावा: नारायण राणे

‘मराठा समाज इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) कधीच आरक्षण घेणार नाही. मनोज जरांगे कोण आहेत, हे मी ओळखत नाही. ते अजून लहान असून, त्यांनी आरक्षण कसे मिळते, याचा अभ्यास करावा,’ असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जरांगे यांना लगावला. ‘कोणत्याही राजकीय नेत्याने ‘मराठा विरुद्ध ओबीसी’ अशी झुंज लावू नये,’ असेही त्यांनी सुनावले.केंद्र सरकारच्या विविध योजनांचा प्रसार-प्रचार व नोंदणीसाठी देशात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ काढण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री राणे यांनी महाराणा प्रताप उद्यान येथे या यात्रेत सहभाग नोंदवला. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे; परंतु ओबीसी किंवा अनुसूचित जातींचे आरक्षण काढून ते मराठा समाजाला देऊ नये. घटनेनुसार, समाजाचे सर्वेक्षण करून आर्थिक-सामाजिक-शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करून ५२ टक्क्यांच्या वर आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. त्यानुसार आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले होते. जरांगे यांना मी ओळखत नाही. त्यांनी जाती-धर्मांना आरक्षण कसे मिळते, त्यासाठी घटनेत काय तरतुदी आहेत, याचा अभ्यास करावा आणि मराठा समाजाला घटनेच्या कोणत्या कलमानुसार आरक्षण देता येईल हे सांगावे,’ असे आव्हानही राणे यांनी जरांगे यांना दिले.

0 9 3 7 6 6
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *