हडपसर – ‘मी स्कॉलरशिपची हुशार विद्यार्थिनी पण, परिस्थितीमुळे शिकू शकले नाही. माझ्यासारखे असे अनेक लोककलावंत आहेत. आमच्याप्रमाणे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची परवड होऊ नये; यासाठी सरकारने स्वतंत्र धोरण आखावे,’ असे आवाहन लावणी नृत्यांगना वैशाली वाफळेकर यांनी केले.कै. पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्यावतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील व आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते तमाशा क्षेत्रातील लोककलावंतांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी पवळा पुरस्कार प्राप्त कलावंत वैशाली वाफळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.प्रतिष्ठानच्यावतीने लोकनाट्य कलावंत मालती इनामदार यांना शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार, ढोलकी वादक कृष्णा मुसळे यांना बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार, शोभा इस्लामपूरकर यांना डॉ. भास्करराव खांडगे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
सिने अभिनेत्री लीला गांधी, माजी महापौर प्रशांत जगताप, प्रतिष्ठानचे संस्थापक जयप्रकाश वाघमारे, मित्रावरून झांबरे, डॉ. शंतनू जगदाळे, दीपक वाघमारे, सत्यजित खांडगे, संदीप घुले, उन्मेश बारभाई, कृष्णा ढेरंगे, पांडुरंग घोटकर, नलिनी कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
‘पारंपारिक लावण्यातील सौंदर्य, ठेका, ताल पाहिला की रसिकांचा जीव गोळा होतो. पारंपरिक लोककलेचा बाज जपण्याचे काम कलावंतांनी करावे. जुन्या लावण्या नव्या ढंगात कराव्यात. पारंपरिक ठेक्यात लावण्याचे सादरीकरण करणारे कलावंत कमी होत आहेत. आता तमाशात ऑर्केस्ट्रा आलाय तो बंद करावा. त्यासाठी पारंपारिक लोककलेचा ठेवा नवीन कलावंत जतन करतील,’ असा विश्वास खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केला.
‘चांगल्या काळात कलावंतांनी स्वतःला सावरायला हवे. तरुण वयात कलावंत हरहुन्नरी असतात, पण उतरत्या वयामध्ये त्यांना हालाखीचे जीवन जगावे लागते. याचाही विचार कुठेतरी व्हायला हवा. लोककलावंतांचा सन्मान व्हायला हवा यातून त्यांना प्रेरणा मिळते,’ असे मनोगत आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केले.यावेळी आयोजित लावणी महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत कलाकारांनी आपली कला सादर केली. गण, गवळण, छक्कड, उडत्या चालीच्या, बैठकीच्या लावण्यांची मुक्त उधळण करीत या लावणी महोत्सवत कलावंतांनी रंग भरले.
Users Today : 4