अनैतिक संबंधांच्या संशयातून अपहरण, हत्या करुन निर्जनस्थळी मृतदेह पुरला; पुणे हादरलं

Khozmaster
3 Min Read

पुणे (इंदापूर) : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील पंधारवाडी येथे अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी तिघांना अटक केली असून चार दिवसांची पोलीस कोठडी इंदापूर न्यायालयाने सुनावली आहे. गणेश लक्ष्मण शिंदे (वय ३३), मच्छिंद्र लक्ष्मण शिंदे (वय ३०), आकाश सुरेश शिंदे (वय २२) (सर्व रा. पंधारवाडी, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे असून, वैभव शिवाजी पारेकर (वय २६ रा. पंधारवाडी) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.

याबाबत मृताचे वडील शिवाजी दामू पारेकर (वय ५४ वर्षे, रा. पंधारवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २८ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी शिवाजी पारेकर हे आपली पत्नी कांताबाई व मुलगा वैभव यांच्या समवेत जेवण करून बसले असताना वरील तीनही आरोपी घरी आले. यामध्ये गणेश शिंदे याने घरात येऊन ”आपल्याला भांडगाव येथे जायचे आहे. तू आमच्या सोबत चल”, असं वैभवला सांगितले. वैभवने आपण तिघांबरोबर भांडगावला चाललो आहोत, असे फिर्यादी यांना सांगितले. गणेशने आणलेल्या चारचाकी वाहनातून त्या तिघांबरोबर वैभव निघून गेला. रात्री उशिरापर्यंत तो आला नाही. त्याची वाट पाहून सकाळची इतर कामे उरकून फिर्यादी आरोपींच्या घरी जाऊन आले.तेव्हा ते तिघे देखील रात्रीपासून घरी आले नाहीत, असं त्यांच्या घरच्यांनी फिर्यादी यांना सांगितलं. त्यानंतर ३० नोव्हेंबरपर्यंत वैभवचा तपास लागला नाही. त्यामुळेच गणेशने त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने वैभवला गुप्तपणे अटकेत ठेवण्याच्या उद्देशाने अपहरण करून त्याचा घातपात केला असावा, अशी फिर्यादीची खात्री झाली. त्यावरून त्यांनी आरोपींविरुद्ध इंदापूर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबूल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप पवार करत आहेत.

गावापासून ७० किलोमीटरवर निर्जनस्थळी पुरला मृतदेह

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी आरोपी वैभवला आपल्यासमवेत घेऊन गेले, त्याच दिवशी त्यांनी बाह्यवळण रस्त्यापासून काही अंतरावर बेडशिंगे गावच्या हद्दीत धारदार हत्याराने वार करुन त्याची हत्या केली होती. त्याचा मृतदेह चारचाकीच्या डिक्कीत रात्रभर ठेवला. घरी आल्यानंतर सकाळी सात ते आठ वाजण्याच्या सुमारास ते त्या चारचाकीतून थेट ७० किलोमीटर अंतर पार करत शिंगणापूरच्या दिशेने गेले. शिंगणापूर ते दहिगाव दरम्यान वावरहिरे (ता.माण जि.सातारा) या गावच्या हद्दीत रस्त्यापासून साधारण दोनशे मीटर अंतरावर डोंगरदऱ्यातील माळावर खड्ड्यात त्यांनी वैभवचा मृतदेह पुरला. तेथून ते परत पंधारवाडीत आले होते.

0 9 3 7 3 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *