पुणे : हौस म्हणून घरात, फार्महाउसवर वन्यप्राणी पाळण्याचे पाश्चात्यांचे लोण आता पुण्यापर्यंत आले आहे. गेल्या पाच वर्षांत पुण्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईतून २,३११ वन्यप्राणी ताब्यात घेतले आहेत. यात बिबट्याचे पिल्लू, रानमांजर, खवले मांजर, भेकर, सरिसृप प्राणी, पक्षी अशा कायद्याने संरक्षण मिळालेल्या साडेसहाशे वन्यप्राण्यांचा समावेश आहे. परदेशी प्राण्यांबरोबरच भारतीय जंगलांमधील वन्यप्राण्यांची तस्करी आणि छुप्या रीतीने खरेदी-विक्रीच्या घटनांत वाढ झाली आहे.
भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार, कोणत्याही वन्यप्राण्याची शिकार; तसेच त्यांच्या अवयवांच्या खरेदी-विक्रीस पूर्ण बंदी आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावरील काळ्या बाजारात वन्यप्राण्यांना लाखो रुपये मिळत असल्याने छुप्या पद्धतीने शिकार किंवा तस्करी केली जाते. प्रामुख्याने कासव, शेकरू, माकड; तसेच विविध प्रकारचे पक्षी पाळण्यासाठी देशात, विदेशात मागणी आहे. पाळण्यासाठी, खाण्यासाठी आणि जादूटोण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. मुंगुसाची शिकार त्यांच्या केसांसाठी केली जाते. चिंकारा, पिसोरी, काळवीट, सांबर, चितळ या हरणांची, रानडुकराची मांसासाठी शिकार केली जाते. घुबडासह काही पक्ष्यांना जादूटोणा करण्यासाठी चोरले जाते.
जनजागृतीची गरज
पाश्चात्यांप्रमाणेच आपल्याकडे सध्या वन्यप्राणी पाळण्याची क्रेझ वाढते आहे. मागणी असल्याने विक्रेत्यांकडून तस्करी केली जाते. सर्वसामान्य नागरिक मात्र वन्यजीव संवर्धन कायद्याबद्दल अनिभज्ञ असतात. आपण घरात पाळलेला प्राणी संरक्षित असल्याचे त्यांनाही माहिती नसते. आजही अनेक घरांमध्ये पिंजऱ्यात पोपट पाळलेला दिसतो, प्रत्यक्षात कायद्यानुसार हा गुन्हा आहे. गैरप्रकार थांबवण्यासाठी व्यापक स्तरावर जनजागृती मोहीम राबविण्याची गरज आहे, अशी माहिती ‘रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट’च्या नेहा पंचमिया यांनी दिली.
हौस संपल्यावर प्राण्यांचे हाल
नागरिक उत्साहाने परदेशी पक्षी, कासव, साप, अजगर विकत घेतात. यातील अनेकांना प्राण्यांची देखभाल करणे जमत नाही, पुरेसा वेळ देता येत नाही. काही घटनांमध्ये प्राणी मरतात किंवा नागरिक सार्वजनिक ठिकाणी त्यांना सोडून देतात. परिणामी, या आक्रमक परदेशी प्राण्यांमुळे स्थानिक वन्यजीवांचे नुकसान होते. काही महिन्यांपूर्वी श्री क्षेत्र बनेश्वर येथील एका तलावातून आम्ही शंभर कासवांची बचाव मोहीम राबवली. यात स्थानिक आणि परदेशी कासवे एकत्र आल्याने नवीन समस्या निर्माण झाल्या होत्या, अशी माहिती ‘रेस्क्यू’च्या नेहा पंचमिया आणि नचिकेत उत्पात यांनी दिली.
Users Today : 15