Wildlife Trafficking: वन्यप्राणी तस्करीचे लोण पुण्यापर्यंत; ५ वर्षांत कारवाईतून २,३११ वन्यप्राणी ताब्यात

Khozmaster
3 Min Read

पुणे : हौस म्हणून घरात, फार्महाउसवर वन्यप्राणी पाळण्याचे पाश्चात्यांचे लोण आता पुण्यापर्यंत आले आहे. गेल्या पाच वर्षांत पुण्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईतून २,३११ वन्यप्राणी ताब्यात घेतले आहेत. यात बिबट्याचे पिल्लू, रानमांजर, खवले मांजर, भेकर, सरिसृप प्राणी, पक्षी अशा कायद्याने संरक्षण मिळालेल्या साडेसहाशे वन्यप्राण्यांचा समावेश आहे. परदेशी प्राण्यांबरोबरच भारतीय जंगलांमधील वन्यप्राण्यांची तस्करी आणि छुप्या रीतीने खरेदी-विक्रीच्या घटनांत वाढ झाली आहे.

प्रशासकीय यंत्रणा सध्या सूत्रांच्या माहितीच्या आधारे धडक मोहिमा राबवून वन्यप्राण्यांचा बेकायदा व्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करते आहे. तस्करीचे रॅकेट रोखण्यासाठी वन विभागाच्या तपास विभागाने कंबर कसली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये पकडलेले, शिकार केलेले वन्यप्राणी तस्करीसाठी पुण्यामार्गे विविध ठिकाणी पाठवले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार, कोणत्याही वन्यप्राण्याची शिकार; तसेच त्यांच्या अवयवांच्या खरेदी-विक्रीस पूर्ण बंदी आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावरील काळ्या बाजारात वन्यप्राण्यांना लाखो रुपये मिळत असल्याने छुप्या पद्धतीने शिकार किंवा तस्करी केली जाते. प्रामुख्याने कासव, शेकरू, माकड; तसेच विविध प्रकारचे पक्षी पाळण्यासाठी देशात, विदेशात मागणी आहे. पाळण्यासाठी, खाण्यासाठी आणि जादूटोण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. मुंगुसाची शिकार त्यांच्या केसांसाठी केली जाते. चिंकारा, पिसोरी, काळवीट, सांबर, चितळ या हरणांची, रानडुकराची मांसासाठी शिकार केली जाते. घुबडासह काही पक्ष्यांना जादूटोणा करण्यासाठी चोरले जाते.

पुण्यात होणाऱ्या कारवायांमध्ये नागरिकांच्या घरातही वन्यप्राणी आढळले आहेत. मात्र, यातील बहुतांश घटनांत कायद्यानुसार भारतीय वन्यप्राणी पाळण्यास बंदी असल्याचे माहितीच नसल्याचे नागरिक सांगत आहेत. पेट शॉप विक्रेत्यांना कायद्याचे ज्ञान असतानाही, काही विक्रेते बेकायदेशीरपणे व्यवहार करीत आहेत. वन विभाग, पोलिस विभाग आणि उत्पादनशुल्क विभागातर्फे पुण्यातील या छुप्या उद्योगांवर कारवाई करण्यात येत आहे. ताब्यात घेतलेले सर्व वन्यप्राणी ‘रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वन्यप्राणी उपचार केंद्रात आणले जातात. त्यांची वैद्यकीय तपासणी करून वन विभागाच्या आदेशानुसार त्यांना निसर्गात सोडण्याचा निर्णय घेतला जातो. परदेशी वन्यप्राण्यांना त्यांच्या मूळ अधिवासात सोडण्याचे निकष आणि प्रक्रिया प्रदीर्घ असते. ‘रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट’कडे पुण्यासह नाशिक, सोलापूर, सातारा, सांगलीमध्ये वन विभागाने ताब्यात घेतलेले वन्यप्राणीही दाखल झाले आहेत.

जनजागृतीची गरज

पाश्चात्यांप्रमाणेच आपल्याकडे सध्या वन्यप्राणी पाळण्याची क्रेझ वाढते आहे. मागणी असल्याने विक्रेत्यांकडून तस्करी केली जाते. सर्वसामान्य नागरिक मात्र वन्यजीव संवर्धन कायद्याबद्दल अनिभज्ञ असतात. आपण घरात पाळलेला प्राणी संरक्षित असल्याचे त्यांनाही माहिती नसते. आजही अनेक घरांमध्ये पिंजऱ्यात पोपट पाळलेला दिसतो, प्रत्यक्षात कायद्यानुसार हा गुन्हा आहे. गैरप्रकार थांबवण्यासाठी व्यापक स्तरावर जनजागृती मोहीम राबविण्याची गरज आहे, अशी माहिती ‘रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट’च्या नेहा पंचमिया यांनी दिली.

हौस संपल्यावर प्राण्यांचे हाल

नागरिक उत्साहाने परदेशी पक्षी, कासव, साप, अजगर विकत घेतात. यातील अनेकांना प्राण्यांची देखभाल करणे जमत नाही, पुरेसा वेळ देता येत नाही. काही घटनांमध्ये प्राणी मरतात किंवा नागरिक सार्वजनिक ठिकाणी त्यांना सोडून देतात. परिणामी, या आक्रमक परदेशी प्राण्यांमुळे स्थानिक वन्यजीवांचे नुकसान होते. काही महिन्यांपूर्वी श्री क्षेत्र बनेश्वर येथील एका तलावातून आम्ही शंभर कासवांची बचाव मोहीम राबवली. यात स्थानिक आणि परदेशी कासवे एकत्र आल्याने नवीन समस्या निर्माण झाल्या होत्या, अशी माहिती ‘रेस्क्यू’च्या नेहा पंचमिया आणि नचिकेत उत्पात यांनी दिली.

0 9 3 7 7 7
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *