सांगली : ऑनलाईन काढण्यात येणारा सात-बाराही आता महाग झाला आहे. यापूर्वी १५ रुपयांना मिळणारा सात-बारा उतारा आता २५ रुपयांना मिळणार आहे. फेरफार नोंदीसाठी यापूर्वी मोफत अर्ज करता येत होता. आता मात्र त्याकरिता २५ रुपये मोजावे लागणार आहेत.सात-बारा ऑनलाईन झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीनेच नागरिकांना उपलब्ध होतो.याकरिता नागरिकांना प्रति सात-बारा १५ रुपये शुल्क भरावे लागते. आता त्यात सरकारने वाढ केली आहे. यापुढे १५ रुपयांचा सात-बारा २५ रुपयांना मिळणार आहे. पहिल्या दोन पानांसाठी ही रक्कम आकारली जाईल. त्यापुढील प्रत्येक पानाला दोन रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहेत.खरेदी-विक्रीची फेरफार वगळता वारस नोंद, बोजा नोंद, बोजा कमी, नाव कमी आदी आठ प्रकारच्या फेरफार नोंदवण्यास आता शुल्क भरावे लागणार आहे.
यापूर्वी फेरफार अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. आता सर्व फेरफार ऑनलाईन पद्धतीनेच नोंदवावे लागणार आहेत.फेरफारसाठी नागरिकांनी स्वतः अर्ज केला, स्वतः कागदपत्रे डाउनलोड केली तर ती निःशुल्क असतील, असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.
राज्य शासनाने खरिपापाठोपाठ रब्बी हंगामासाठीही १ रुपायांत पीक विमा योजना लागू केली आहे. मात्र, सरकारी सेतू केंद्रातून प्रत्येकी दीडशे रुपयांची आकारणी केली जात असल्याचे चित्र आहे. विमा मोफतच आहे. आम्हाला दीडशे रुपये द्यावेत, अशी थेट मागणी केली जात आहे. याबद्दल तक्रारी करण्यासही कोणी समोर येत नसल्याचे चित्र आहे.
Users Today : 29