Pimpri Fire: दुपारी घरी परतल्या अन् आगीतून वाचल्या, पण जीवाला जीव देणाऱ्या सख्या होरपळल्या; चंद्रकला स्वामींचा कंठ दाटला

Khozmaster
2 Min Read

पिंपरी :‘नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी कामाला गेले. दर्शनासाठी शनीशिंगणापूरला गेलेली लेक अन् जावई येणार असल्यामुळे दुपारीच घरी परतले. कंपनीला भीषण आग लागल्याचे सायंकाळी समजले. नशीब बलवत्तर म्हणून वाचले; पण मैत्रिणी गमावल्याचे दुःख मोठे आहे,’ या शब्दांत चंद्रकला स्वामी यांनी भावनांना मोकळी वाट करून दिली.फटाक्याच्या कंपनीत काम करणाऱ्या आणि तळवडेच्या श्रीराम कॉलनीत वास्तव्याला असलेल्या चंद्रकला स्वामी भावनाविवश होऊन बोलत होत्या. कंठ दाटून आल्याने त्यांचा स्वर कंपित झाला होता. डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. त्या म्हणाल्या, ‘आमचे कुटुंब मूळचे लातूर जिल्ह्यातील निलंग्याचे. कामानिमित्त तळवड्यात राहायला आलो. घरापासून जवळच असलेल्या कंपनीत रोजावर काम करते. दोनेक वर्स झाल्याती. रोजच्यावानी सकाळी कामाला गेले; पण लेकी संगीता, ज्योती आणि त्यांची मंडळी घरी येणार व्हती. म्हणून सायबाला म्हणले, घरी जायचंय..साहेब लई चांगले. म्हणाले, घरी सोडायला येऊ का, मीच नको म्हणाले. अन् चालतच घरी आले.शनीशिंगणापूरला गेल्याले पाव्हणं येणार म्हणून स्वैपाक करू लागले. त्यानंतर सांच्याला कंपनीत आग लागल्याचं कळालं. तुमच्या कंपनीतल्या बायका मेल्या, असं शेजाऱ्यापाजारींनी सांगितलं. तवा जवळच राहणाऱ्या सावित्रीकडे धावत गेले. तिला पाहताच डोळ्यांतून पाणी आलं. जीव वाचला पण जीवाभावाच्या सोबती गेल्या,’ असं सांगताना चंद्रकलाबाईंना दुःख अनावर झाले.

लातूरच्याच सावित्री सरवदे रडवेल्या स्वरांत म्हणाल्या, ‘मी याच कंपनीत कामाला हाय. माझी पोरगी आजारी म्हणून आज कामाला गेले नव्हते. लई वंगाळ झालं. आम्ही वीसेक जणी हसतखेळत काम करायचो. कवा कवा गमती करायचो. दिवसाकाठी तीनएकशे रुपये मिळायचे. तेवढाचं परपंचाला हातभार लागत हुता. पोटाची खळगी भरण्यासाठी मदत व्हत हुती. गरीबाघरच्या बायका कंपनीत कामाला येत व्हत्या. त्यातल्या काहीजणी गेल्या. एक तर नवऱ्याशी पटत नसल्यामुळं लेकीसह आईकडे राहत हुती. काम करून पोट भरत व्हत्या. काय सांगू तुम्हांला, खूप खूप वाईट वाटतं. समदां विस्कुट झाला बघा.’

0 9 3 7 4 1
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *