वेश्यांचे बाळ, संपेना आबाळ…; मुलांच्या जन्मदरात घट, शिक्षणातील अडचणी मात्र कायम

Khozmaster
2 Min Read

नाशिक : नियमित ग्राहकाशी आलेल्या शरीरसंबंधांतून झालेले मूल…… त्या ग्राहकाने फिरवलेली पाठ अन् त्यानंतर त्या मुलांची सुरू झालेली आबाळ…… वेश्यांच्या मुलांबाबतचे अनेक वर्षांपासूनचे हे दुष्टचक्र आता काहीसे संथावत असले, तरी अद्यापही या मुलांची परवड संपलेली नाही. उच्चशिक्षणाबाबत त्यांचे हालच होत असल्याचे चित्र आहे.वारांगनांकडे येणाऱ्या ग्राहकांपैकी काही जणांशी त्यांचे भावनिक संबंध जुळतात. त्याला पती मानून काही वेश्या अपत्य होऊ देतात. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी गर्भनिरोधक साधनांबाबत जागृती नव्हती. त्यामुळे वेश्यांकडून अनेकदा खबरदारीविनाच शरीरसंबंध ठेवले जात असत. त्यातूनही त्यांना गर्भधारणा होत असे. या मुलांना स्वीकारण्यास त्यांचे वडील नकार देत असत. त्यामुळे या मुलांची जन्मापासूनच आबाळ होत असे. त्यांना कुंटणखान्यांवरच ठेवले जाई. धड शिक्षणही मिळत नसे. मात्र, एचआयव्ही एड्समुळे गर्भनिरोधक साधनांबाबत जागरूकता वाढली. त्यामुळे गेल्या पंधरा ते वीस वर्षांत वेश्यांच्या मुलांचा जन्मदर निम्म्याने घटला. पुण्यातील बुधवार पेठ या वेश्या वस्तीत अनेक वर्षांपासून वारांगनांसाठी काम करणाऱ्या सहेली संस्थेच्या कार्यकारी संचालिका तेजस्वी सेवेकरी यांनी याबाबत ‘मटा’ला माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘वेश्यांच्या मुलांच्या जन्मदरात घट झाली असून, त्यांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्थाही पुढे आल्या आहेत. त्यामुळे मुलगे वा मुलींचे दहावीपर्यंतचे शिक्षण सुरळीत पार पडते. त्यानंतर मात्र हुशार विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो व ते उच्च शिक्षण घेऊ शकतात. साधारण मुलांचे शिक्षण तेथेच थांबते. त्यानंतर मुलींचे लग्न लावले जाते, तर मुले दुरुस्तीची लहान-मोठी कामे करतात किंवा राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते होतात. योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास ही मुले गुन्हेगारी वा दलालीकडे वळण्याची भीती असते. अशा मुलांसाठी सरकारने ठोस काही करण्याची गरज असल्याचे सेवेकरी यांनी सांगितले.वेश्यांच्या मुली त्याच व्यवसायात येतात व मुले दलाली करतात, हा गैरसमज आहे. अनेक मुली-मुले छोटा का होईना, स्वतंत्र व्यवसाय करीत आहेत. मात्र, त्यांना मदत करण्याच्या नादात अनेकदा संस्थांकडून त्यांची ओळख जाहीर होते. त्यामुळे या मुलांच्या आयुष्यात अडचणी निर्माण होतात.- तेजस्वी सेवेकरी, सामाजिक कार्यकर्त्या

बुधवार पेठेत २८० मुले

पुण्यातील बुधवार पेठेत सुमारे तीन हजार महिला कुंटणखान्यांत व्यवसाय करतात. तर पुणे शहरात स्वतंत्ररीत्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची संख्या नऊ हजारांवर आहे. बुधवार पेठेतील वेश्यांची २८० मुले निरनिराळ्या संस्थांमध्ये ठेवण्यात आली असल्याचे सेवेकरी यांनी सांगितले.

0 9 3 8 3 5
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *