पाणी योजनेचा खर्च ५० कोटींनी वाढणार, ५२ जलकुंभ आणि जलवाहिन्या उभारणार

Khozmaster
2 Min Read

छत्रपती संभाजीनगर : जलकुंभांचे बांधकाम करण्यासाठी नवा कंत्राटदार नेमण्याच्या तयारीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आहे. महापालिका प्रशासकांशी चर्चा करून याबद्दलचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. नवीन कंत्राटदार नेमण्याचा निर्णय झाल्यास पाणीपुरवठा योजनेचा खर्च किमान ५० कोटींनी वाढण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर शहराची पाण्याची समस्या लक्षात घेऊन, राज्य सरकारने शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली. ज्या वेळी या योजनेला मंजुरी देण्यात आली, त्या वेळी योजनेची किंमत १६८० कोटी रुपये होती. त्यानंतर योजनेच्या कामात बदल करून व प्रत्येक नळ कनेक्शनला मीटर लावण्याची योजना आखून या योजनेची किंमत २७४० कोटी रुपयांवर नेण्यात आली आहे. पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान २५०० मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकणे, जायकवाडी धरणात जॅकवेलसह पंपहाउस उभारणे, नक्षत्रवाडी येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारणे, एमबीआरचे बांधकाम करणे, एमबीआरपासून शहरातील जलकुंभांना जोडणाऱ्या जलवाहिन्या टाकणे, अंतर्गत जलवाहिन्या टाकणे आणि ५२ जलकुंभ उभारणे या कामांचा समावेश आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजनेचे काम केले जात आहे. प्राधिकरणाने जीव्हीपीआर या कंपनीला या कामाचे कंत्राट दिले आहे. जलकुंभांची कामे वगळता अन्य कामांना कंपनीने गती दिली आहे. ही कामे निर्धारित वेळेमध्ये होण्याची शक्यता आहे. परंतु, जलकुंभांची कामे लांबतील असे लक्षात आले आहे. त्यामुळे या कामांसाठी नवा कंत्राटदार नियुक्त करण्याचा विचार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करीत आहे.

प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी याबाबत म्हणाले, ‘जलकुंभ बांधणीच्या कामासाठी स्वतंत्र कंत्राटदार नियुक्त करण्याच्या प्रस्तावावर विचार केला जात आहे. स्वतंत्र कंत्राटदार नियुक्त केल्यास जलकुंभांची कामे गतीने होतील. याबद्दल पालिका प्रशासकांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. ‘डीएसआर’चे दर पन्नास ते साठ टक्यांनी वाढले आहेत, त्याशिवाय नवीन कंत्राटदारांना जलकुंभांच्या कामांसह जलवाहिनीचे कामदेखील द्यावे लागणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या कामाची किंमत वाढेल. किंमत किती वाढेल हे प्रस्ताव तयार केल्यावरच स्पष्ट होईल.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जलकुंभ व जलवाहिनींच्या कामासाठी स्वतंत्र कंत्राटदार नियुक्त केल्यास पाणीपुरवठा योजनेचा खर्च किमान ५० कोटी रुपयांनी वाढू शकतो. सध्या या योजनेची किंमत २७४० कोटी रुपये आहे.

0 9 3 8 4 1
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *