नागपूर: महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सकस आणि रुचकर आहार मिळावा यासाठी समिती नेमण्यात आली आहे. २५ जिल्ह्यांमध्ये यासाठी प्रशिक्षणही देण्यात आले. आठवड्यातून एकदा विद्यार्थ्यांना अंडी किंवा केळी दिली जाणार, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.आणिकगाव, चेंबूर, मुंबई येथील महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याचा मुद्दा आमदार अबू आझमी यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अपुऱ्या सुविधा आहेत. सकस आहाराकडे दुर्लक्ष करण्यात येते. वस्तू खरेदी करूनही सहा सहा महिने त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था नाही. शाळांचे ऑडिट तयार करून श्वेतपत्रिका काढण्यात यावी, अशी मागणी आमदार वर्षा गायकवाड यांनी केली.
फॉरेन्सिक अहवाल आलाच नाही
४०० ग्रॅमऐवजी केवळ २०० ग्रॅम खिचडी दिली जाते. अनेक विद्यार्थ्यांना खिचडीच मिळत नाही. दोषी संस्थेवर कोणती कारवाई केली, असा मुद्दा विरोधी आमदारांनी उपस्थित केला. मुंबई महापालिकेच्या शाळेत १६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. ‘संबंधित आहार पुरवठा करणाऱ्या संस्थेचे कामकाज काढून टाकण्यात आले आहे. त्या संस्थेवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. असे प्रकार पुढे घडू नये यासाठी धान्याची तपासणी करण्यात येईल’, असे दीपक केसरकर यांनी सांगितले. विषबाधा झाल्यानंतरचा फॉरेन्सिक अहवाल यायला उशिर झाल्याची माहितीही त्यांनी दिली. यावर विरोधकांनी आक्षेप घेत अहवाल केव्हा येणार असा जाब विचारला. तत्काळ अहवाल मागविण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
Users Today : 11