पुणेकरांसाठी Good News, शहराला ३ नद्यांमधून मिळणार अतिरिक्त पाणी; कसे? वाचा सविस्तर…

Khozmaster
3 Min Read

पुणे : कोकणातील अतिरिक्त पाणी कृष्णा खोऱ्याकडे वळविण्याच्या योजनेमुळे पुणे शहराला अतिरिक्त साडेचार अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी मिळणार आहे. एकीकडे, पुणेकरांचे पाणी पळविण्याचा आरोप सातत्याने होणाऱ्या जलसंपदा विभागाने पुण्याला अतिरिक्त पाणी देण्याची योजना आखली आहे. ‘प्रकल्प वर्षां’तर्गत पुण्यासाठी अतिरिक्त पाणी मिळविण्यासाठी महापालिका आणि ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’ला (पीएमआरडीए) अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.

तीन प्रकारे नद्यांत पोहोचणार पाणी

कृष्णा खोऱ्यातील नद्यांमध्ये कोकणातील अतिरिक्त १५.११ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी विविधप्रकारे पोहोचविण्यात येणार आहे. सह्याद्रीच्या पश्चिमेकडील वळण बंधारा उतारावर आहे. हा वळण बंधारा पूर्वेकडील धरणाच्या पातळीपेक्षा उंचीवर आहे. त्यामुळे गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने बंधाऱ्यातील पाणी बोगद्याद्वारे पूर्वेकडे वाहून नेणे शक्य आहे. मुंबईजवळ माथेरानला पाणीपुरवठा करण्यासाठी हा बंधारा बांधण्यात आला आहे. प्रत्येक नाल्यावर वळण बंधारे बांधणे शक्य नाही. अतिवृष्टीमुळे रस्त्यांची दुरवस्था होऊ नये, यासाठी ताम्हिणी घाटात ‘जलअपवर्तन नाली’ची योजना केली आहे. या नाल्यामुळे उंच टेकड्यांवरून वाहत येणारे पाणी जमा होते. हे पाणी नंतर जवळच्या बंधाऱ्यामध्ये वळवून पूर्वेकडे येऊ शकते. वळण बोगद्यासाठी बंधाऱ्याच्या खालील बाजूस योग्य जागेची निवड केली आहे. त्यामुळे पश्चिमेकडील अतिरिक्त पाणी पूर्वेकडील जलाशय आणि नद्यांना येऊन मिळेल. पावसाळ्यात पाणी पूर्वेकडे अखंडपणे स्थलांतरित व्हावे, अशा पद्धतीने बोगद्याचा आकार आणि उतार निश्चित केला आहे.

पुण्याला पाणी कसे मिळणार?

– घोसेखांबपासून कोरीगडापर्यंतचे पाणी मुळा-मुठा कंटूर कालव्यात घेऊन पूर्वेकडे मुळशी धरणात सोडणार.

– मुळा-मुठा वळण बंधाऱ्यातील पाणी बोगद्याद्वारे मुळशी जलाशयात सोडण्याचे नियोजन.

– त्याच घाटमाथ्यावरील म्हाशा डोंगरापर्यंत दुसरा कंटूर कालवा प्रस्तावित असून, पाणी दुसऱ्या वळण बंधाऱ्यात संकलित करून पुढे ते पाणी मुळशी जलाशयात सोडले जाईल.

– केतकाई डोंगर, फडाई डोंगरामधील पाणलोट क्षेत्र आंतरक्षेत्रीय करून दुसरा कंटूर कालवा प्रस्तावित आहे. त्यातील पाणी मुळशी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातील पिंपरी गावाजवळ सोडण्यात येईल.

– या कंटूर कालव्याच्या पाणलोट क्षेत्रास लागून तिसरे वळण बंधारे हे निवे गावाजवळ बांधण्याचे नियोजन असून, त्यातील पाणी मुळशी जलाशयात सोडण्यात येईल.- पुढील घाटमाथ्यावर वळण बंधारे; तसेच संतुलन तलाव प्रस्तावित करून त्यातील पाणी वरसगाव धरणात घेण्याचे प्रस्तावित आहे

– घोळ गावाच्या वरील बाजूला संतुलन तलाव, वळण बंधारे, नाले, अशी विविध चार धरणस्थळे प्रस्तावित केली आहेत. दोन कंटूर कालवे प्रस्तावित आहेत. ते पाणी पानशेत धरणात सोडण्याचे नियोजन आहे.

– वळण बंधारे खानू गावाजवळ प्रस्तावित आहेत. या गावापासून चंदर गावाच्या घाटमाथ्यापर्यंत तीव्र उतार असल्याने पाणी अडवून पूर्वेकडे वळविण्यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध नाही.

केंद्रीय जल आयोगाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत आम्ही पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळविण्याबाबत नकाशाच्या आधारे अभ्यासाचे २०१५मध्ये सादरीकरण केले होते. जल आयोगाने त्याला मान्यता दिली होती. २०१९ मध्ये अभ्यास सादर केल्यानंतर त्याला सरकारने तत्वत: मान्यता दिली. आता प्रत्यक्ष सर्वेक्षण होऊन पुढे त्याला गती मिळत असल्याने कष्टाचे चीज झाले आहे.- वर्षा सहाणे, उप कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

0 9 3 8 5 2
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *