स्मशानभूमीही गहिवरली! तळवाडे कंपनी स्फोटातील ६ जणींची सरणं एकाशेजारी एक, अंत्यसंस्कारावेळी कुटुंबीयांचा टाहो

Khozmaster
2 Min Read

पिंपरी : तळवडे येथील स्पार्कल कँडल तयार करणाऱ्या कंपनीत स्फोट होऊन मृत्युमुखी पडलेल्या सहा महिलांवर सोमवारी (११ डिसेंबर) एकाच वेळी निगडी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराच्या वेळी मृतांच्या नातेवाईकांनी एकच टाहो फोडला. या वेळी स्मशानभूमीच्या मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

तळवडे-ज्योतिबानगर येथील शिवराज एंटरप्रायजेस या कंपनीत बेकायदेशीरपणे ‘स्पार्कल कँडल’ बनविण्याचे काम सुरू होते. शुक्रवारी (८ डिसेंबर) दुपारी अचानक भडका उडून स्फोट झाला. यात यात संगीता देवेंद्र अबदार (वय २८), पूनम अभय मिश्रा (वय ३६), लता भारत दंगेकर (वय ४०), मंगल बाबासाहेब खरबडे (वय ४५), कमलादेवी सुरज प्रजापती (वय ६१), राधा सयाजी गोधडे (वय ६१) या सहा महिला कामगारांचा जागीच मृत्यू झाला. मोठ्या तीव्रतेचा स्फोट असल्याने मृत महिलांच्या शरीराचा अक्षरश: कोळसा झाला. त्यामुळे त्यांची ओळख पटविण्यात अडचणी येत होत्या.

त्यामुळे मृत सहा महिलांचे तसेच त्यांच्या नातेवाईकांचे असे एकूण १२ नमुने डीएनए चाचणीसाठी शनिवारी पुणे येथील न्याय वैद्यकीय सहाय्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. प्रयोगशाळेत एका ‘डीएनए’ चाचणीसाठी सुमारे १८ तास लागतात. त्यामुळे सहा महिलांचे डीएनए आणि त्यांच्या सहा नातेवाईकांचे डीएनए यांची चाचणी घेऊन त्याचा अहवाल मिळण्यास किमान तीन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली होती. मात्र, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अहवाल लवकर उपलब्ध करून देण्यात आले. ‘डीएनए’ अहवाल आला नसल्याने त्या महिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही करण्यात आले नव्हते. सहा महिलांचे मृतदेह पिंपरी येथे वायसीएम रुग्णालयातील शीतगृहात ठेवले होते. सहाही महिलांच्या मृतदेहांचा ‘डीएनए’ अहवाल रविवारी सायंकाळी प्राप्त झाला. मृतदेह सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर सहा मृतदेहांवर निगडी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने नातेवाईक उपस्थित होते.दोघी माय-लेकींवर यवतमाळला अंत्यसंस्कार

ससून रुग्णालयात उपचारादरम्यान कविता राठोड आणि शिल्पा राठोड या माय-लेकींचा मृत्यू झाला. राठोड कुटुंबीय मूळचे यवतमाळ येथील आहे. त्यामुळे या माय-लेकींवर मूळ गावी अंत्यसंस्कार व्हावेत, अशी इच्छा नातेवाईकांनी व्यक्त केली. महापालिका प्रशासनानेही त्यांना अनुमती देऊन दोन्ही मृतदेह नेण्यासाठी शववाहिका उपलब्ध करून दिली. त्यानुसार दोघी माय-लेकींचे मृतदेह यवतमाळला नेण्यात आले आहेत, अशी माहिती ‘वायसीएम रुग्णालया’चे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली.

0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *