पिंपरी-चिंचवडमध्ये जळीत कक्ष सुरु करा; नीलम गोऱ्हे यांच्या राज्य सरकारला सूचना

Khozmaster
2 Min Read

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयातील जळीत कक्षाच्या सक्षमीकरणासह पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) जळीत कक्ष सुरू करण्याची सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्य सरकारला दिली.

तळवडे येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहवाल दिला असून, त्यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील शासकीय रुग्णालयात जळीत कक्ष सुरू करणे, अस्तित्वातील जळीत कक्षांच्या सक्षमीकरणाचे आदेश दिले आहेत.

तळवडे येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारी रुग्णालयांमधील जळीत कक्षांच्या वस्तुस्थितीबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सर्वांत पहिल्यांदा आवाज उठवला होता. विधानसभा आणि विधानपरिषदेत अनुक्रमे आमदार महेश लांडगे आणि उमा खापरे यांनी सोमवारी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. येत्या आठवडाभरात या घटनेच्या पार्श्वभूमीवर चर्चा आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन डॉ. गोऱ्हे यांनी सभागृहात दिले.विचारपूस अन् बैठक

डॉ. गोऱ्हे यांनी तळवडे येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयात जाऊन या घटनेतील जखमींची विचारपूस केली होती; तसेच या घटनेशी संबंधित सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही आयोजित केली होती. या वेळी त्यांना जाणवलेल्या आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी निदर्शनास आलेल्या सूचनांचा अहवाल सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार त्यांनी सोमवारी सायंकाळी आपला अहवाल सरकारला सादर केला.बेकायदा आस्थापने

तळवडे येथील घटना घडली तो परिसर संरक्षण विभागाने घोषित केलेल्या ‘रेड झोन’मध्ये येत आहे. या परिसरात साडेतीन हजार बेकायदा व्यावसायिक आस्थापने आहेत. तेथील व्यावसायिकांनी ‘शॉप अॅक्ट’ परवाना घेतला असला तरी त्या ठिकाणी नेमके कोणते व्यवसाय सुरू आहेत, याचे सर्वेक्षण करण्याची आवश्यकता अहवालात नमूद करण्यात आली आहे. व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ लावणे बंधनकारक करणे; तसेच औद्योगिक सुरक्षा महामंडळाकडून त्या ठिकाणी सुरक्षिततेची पुरेशी खबरदारी घेण्यात येते की नाही, याची खातरजमा करणे आवश्यक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी अहवालात नमूद केले आहे.

स्थलांतर आवश्यक

‘रेडझोन’मधील अतिधोकायदाक व्यवसायांचे स्थलांतर करणे आवश्यक आहे. नगर विकास विभाग, गृह विभाग, कामगार कल्याण मंडळ, औद्योगिक सुरक्षा महामंडळ; तसेच महिला व बालकल्याण विभाग या सर्वांनी मिळून अशा घटना टाळण्यासाठी खबरदारी घेण्याची आवश्यकता डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.

0 9 3 8 5 2
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *