सिंहस्थाबाबत महापालिकाच उदासीन; आमदार सीमा हिरे यांचा विधानसभेत दावा

Khozmaster
2 Min Read

नाशिक : सन २०२७ मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थासाठी राज्य सरकारकडून कोणतीच हालचाल होत नसल्याने महापालिकेकडून प्राथमिक स्वरूपात ११ हजार कोटींचा सिंहस्थ आराखडा तयार करण्यात आला आहे. दुसरीकडे महापालिका सिंहस्थासाठी काहीच करत नसल्याचा दावा नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी केला आहे. त्यामुळे याबाबत राज्य सरकारला जागे करणे अपेक्षित असताना त्यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नाशिमध्ये २०२७-२८ मध्ये सिंहस्थ होत आहे. त्याचे नियोजन आतापासूनच सुरू व्हायला हवे आहे. परंतु, राज्य शासनाला यासाठीच्या तयारीचा विसर पडला आहे. त्यामुळे महापालिकेने आपल्या पातळीवर सिंहस्थाची तयारी सुरू केली आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या सूचनेनुसार तत्कालीन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ आराखडा समन्वय समिती स्थापन करण्यात आली होती. पदभार स्वीकारल्यानंतर नूतन आयुक्त डॉ. अशोक कंरजकर यांनी प्रारूप आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, सिंहस्थ समन्वय अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने ११ हजार १२७ कोटींचा प्रारूप आराखडा तयार केला. आता राज्य सरकारने यासंदर्भात पावले उचलण्यासाठी शहरातील आमदारांकडून शासन दरबारी लॉबिंग करणे अपेक्षित असताना आमदार सीमा हिरे यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. त्यामुळे पालिकेतील अधिकारी आता नाराज झाले आहेत. आज महापालिकेत विभागप्रमुखांची बैठक झाली, तीत आराखड्यातील याद्या प्रमाणित करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी केल्या.भुजबळांचे मुख्यंमत्र्यांना पत्रसिंहस्थासाठी राज्य शासनाने जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय संनियंत्रण समिती कार्यान्वित करावी, अशी मागणी अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. राज्य व केंद्रशासनाकडून निधी मिळण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील कामांबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची कार्यवाही व्हावी, अशी मागणीही भुजबळ यांनी पत्राद्वारे केली. सिंहस्थासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आतापासून तयारी केली, तरच सिंहस्थापर्यंत कामे पूर्ण होतील. त्यासाठी नाशिकच्या पायाभूत सुविधांकरिता महापालिकेने आणि त्र्यंबकेश्वरमधील सुविधांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने सूक्ष्म नियोजन करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची गरज असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.

0 9 3 8 6 1
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *