मांजरी : येथील स्मशानभूमीमधील सरण रचण्यासाठी दाहिनीत बसविलेल्या बीडाच्या जाळ्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे मृतावर अंत्यसंस्कार करताना नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
गाव पालिकेत समाविष्ट झाल्यानंतर पालिकेकडून देखभाल करण्याची गरज असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. गावाचे वाढते नागरिकरण लक्षात घेऊन पूर्वीच्या ग्रामपंचायत प्रशासनाने स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी बीडाच्या धातूचे चार चौथरे बनविले होते.
मात्र, समावेशाच्या दोन वर्षानंतरही पालिकेकडून येथे मिळणाऱ्या सुविधांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे स्मशानभूमीत सध्या सुविधांची वानवा पाहायला मिळत आहे. सध्या याठिकाणी सुरक्षारक्षक नाही, वेळोवेळी स्वच्छता होत नाही, पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे.
सुरक्षारक्षक नसल्याने छोट्या मोठ्या साहित्याची चोरी होत आहे. अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना मार्गदर्शन होत नसल्याने दु:ख बाजूला ठेवून धावपळ करावी लागत आहे. “स्मशानभूमीत असलेल्या चार चौथऱ्यांपैकी दोन चौथाऱ्यांचा जाळीचा भाग चोरीला गेला आहे.
त्यामुळे सरणासाठी लाकडे, गोवऱ्या रचणे अवघड झाले आहे. याशिवाय दशक्रिया विधीच्या ठिकाणी मोकाट कुत्री घान करीत आहेत. त्याठिकाणी स्वच्छ्ता होत नाही. अनेक वेळा सावडण्याचा विधी करण्यासाठी पाणी नसते,’ अशी तक्रार तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर व बाळासाहेब घुले यांनी केली आहे.पालिकेने तातडीने सुविधा उपलब्ध करून न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.”स्मशानभूमीतील असुविधेची पाहणी करून आवश्यक सर्व दुरूस्ती लवकरात लवकर केली जाईल. सुरक्षारक्षकाबाबत मुख्य खात्याला कळविले जाईल.’RR
Users Today : 0