पावसाळा संपत असताना गुलाबी थंडीला सुरुवात झाली की, हजारो किमी अंतर कापून उत्तर सायबेरीया, युरेशिया आणि उत्तर गोलार्धातील विविध देशांतील स्थलांतरित पक्षी भारतात दिसू लागतात महाराष्ट्रातही या पक्ष्यांची संख्या असते. पण या पक्ष्यांचे पसंतीचे तलाव देखभाल, दुरुस्तीअभावी दुरवस्थेत असल्याने त्यांचे हे आसरेच अनाथ झाल्याचे दिसून येत आहे.जैवविविधतेने परिपूर्ण असलेल्या महाराष्ट्रात दरवर्षी परदेशी स्थलांतरित पक्षी मोठ्या संख्येने येतात. हे पक्षी बहुतांश पाणपक्षी असतात त्यातही बदक वर्गातील पक्ष्यांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हे पक्षी समुद्र, नदी, तलाव परिसरात दिसून येतात. गडचिरोली, भंडारा, गोंदिया हे चार जिल्हे तलावांचे म्हणून ओळखले जातात. स्थलांतरित पक्ष्यांसाठी हे तलाव उत्तम आश्रयस्थळे आहेत.येथे त्यांना खाद्य मिळते, शिकारी पक्षी, प्राण्यांपासून लपण्यासाठी येथे उपयोगी वनस्पती, हिवाळी झुडपे असतात. त्यामुळेहे स्थलांतरित पक्षी तलाव परिसरात राहणेच अधिक पसंत करतात. मात्र मागील काही वर्षांत या तलावांची रयाच गेली आहे. चार जिल्ह्यांसह महाराष्ट्रात असलेले माजी मालगुजारी तलाव व इतर गाव तलावांच्या देखभाल, दुरुस्तीकडे सरकारचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे अनेक तलावांमध्ये गाळ साचून त्यांची साठवण क्षमता कमी झाली आहे. कित्येक तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. काही तलाव परिसरात पर्यटनासाठी येणारे पर्यटक कचरा टाकतात, काही गाव तलावात नागरिकच कचरा टाकून त्याचा उकिरड करतात. त्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांची ही आश्रयस्थाने आता दयनीय अवस्थेत पोहोचली आहेत. दरवर्षी राज्यात अनेक स्थलांतरित पक्षी येतात. शिकारी पक्षी म्हणून ओळखला जाणारा पक्षी म्हणजे’मार्श हॅरिअर’ अर्थात दलदल ससाणा,युरोप आणि आशिया खंडामध्ये मुख्यत्वे आढळणारा ‘यलो वॅगटेल’ ज्याला मराठीमध्ये ‘धोबी’ म्हटले जाते, युरोप, आशिया खंडातील ब्ल्यू थ्रोट (नीलकंठ), युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिकेचा मूळ रहिवासी असणारा नॉर्दन शॉव्हेलर (थापट्या) याशिवाय स्पून बिल (चमचाबाज), पिनटेल ( सररूची), ग्रे लेग गुज कलहंस), बार हेडेड गुज (पट्टकादंब ) रूडी शेल्डक (चक्रवाक), लिटील रिंग्ड प्लव्हर (कंठेरी चिलखा), रेड क्रेस्टेड पोचर्ड ( लालसरी ) असे अनेक पक्षी हिवाळ्यात स्थलांतर करून आपल्याकडे तलावांसारख्या पाणथळ भागात मुक्कामी असतात. पण या परदेशी पाहुण्यांसाठी तलावांची नीट निगासुद्धा राखली जात नाही. गडचिरोली जिल्ह्यातही तलावांची संख्या मोठी आहे. पण गडचिरोली शहराच्या मध्यभागी असलेल्या मुख्य तलावासह इतरही अनेक तलावांची अवस्था दयनीय आहे. मागील काही वर्षात देशातच स्थलांतरित पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. बदलते हवामान, प्रदूषण, खाद्याची कमतरता अशी अनेक कारणे यासाठी सांगितली जात असली, तरी तलावांकडे झालेले दुर्लक्षसुद्धा महत्त्वाचे कारण आहे.
तलाव नव्हे सृष्टीच….
■ तलाव म्हणजे एखाद्या मोठ्या खड्डयातील पाणपसारा नसतो, तर जैवविविधतेने समृद्ध अशी ती आगळीवेगळी सृष्टी असते. या तलावांतून अनेक शेतांना सिंचन मिळते, गावातील नागरिक पिण्याचे, अंघोळीचे पाणी, कपडे धुणे, पाळीव पशूंना पाणी पाजणे, त्यांच्या अंघोळीसाठी तलाव वापरतात.या तलावातील माश्यांमुळे माणसांना उत्तम प्रथिने मिळतात. मासेमारांना रोजगार मिळतो. शिवाय जंगलालगत असलेल्या अनेक तलावांवर वाघ, बिबट, गवे, चितळ, सांबर, रानडुक्कर, रानकुत्रे असे अनेक वन्यजीव आपली तहान भागवतात. म्हणून केवळ स्थलांतरित पक्षीच नव्हे, तर इतर वन्यजीव आणि मानवांसाठीही तलाव आवश्यक आहेत. परदेशातून येणारे अनेक स्थलांतरित पक्षी तलाव परिसरात राहणे पसंत करतात. पण सध्याची अनेक तलावांची अवस्था अगदी माय-बाप नसल्यासारखीच झाली आहे. तलाव या स्थलांतरित पक्ष्यांसोबत स्थानिक पक्षी, मासे, पाळीव प्राणी, वन्यप्राणी व माणसांसाठीसुद्धा महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तलावांची निगा राखणे अतिशय आवश्यक आहे. “- संजय करकरे, सृष्टी कंझर्वेशन फाउंडेशन, नागपूर
Users Today : 5