पुणे : नारायणगाव परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या आठ बांगलादेशी नागरिकांना राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी पकडले. प्राथमिक चौकशीत बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांद्वारे भारतात घुसखोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. बांगलादेशी नागरिक नारायणगाव परिसरात मजुरी करत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे.
मेहबुल नजरून शेख, राणा जमातअली मंडल, गफूर राजेवली शेख, आलमगीर जमातअली मंडल, शालोम मुस्तफिजूर मंडल, अफजल हमीबुल खान, कबीर मुज्जाम मुल्ला, जमातअली व्हायतअली मंडल या आठ बांगलादेशी नागरिकांविरुद्ध बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची एटीएसकडून चौकशी करण्यात येत आहे.नारायणगाव परिसरात बांगलादेशी नागरिकांनी बेकायदा वास्तव्य केले होते. याबाबतची माहिती एटीएसच्या पथकाला मिळाली. त्यानंतर एटीएसच्या पथकाने गुरुवारी आठ बांगलादेशी नागरिकांना नारायणगाव परिसरातून ताब्यात घेतले.आठवड्यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि एटीएसने पुणे, ठाणे परिसरात कारवाई करुन आयसिसच्या दहशतवादी विचारधारेचा प्रसार करणाऱ्या १५ जणांना ताब्यात घेतले होते. याप्रकरणात कोंढव्यातील दोघांची चौकशी करण्यात आली होती.
बुधवार पेठेतून बांगलादेशी महिलांना पकडले
पुण्यातील बुधवार पेठेत बांगलादेशी महिलांनी बेकायदा वास्तव्य केल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. तीन महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांना बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत कारवाई करुन बांगलादेशी महिलांसह साथीदारांना ताब्यात घेतले होते. बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.
Users Today : 2