पुणेकरांची सुरक्षा ‘रामभरोसे’; वर्दळीच्या अनेक रेल्वे स्थानकांवर RPF कर्मचारीच नियुक्त नाहीत

Khozmaster
2 Min Read

 पुणे : पुणे रेल्वे विभागातील आकुर्डी, पिंपरी, कामशेत अशा अनेक महत्त्वांच्या स्थानकांवरून रोज दहा हजारांपेक्षा जास्त प्रवासी रेल्वेने प्रवास करतात; पण या स्थानकांवर रेल्वे सुरक्षा दलाचा (आरपीएफ) एकही कर्मचारी नसल्यामुळे रेल्वेने तेथील सुरक्षा वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे.

पुणे रेल्वे विभागात छोटी-मोठी ७३ स्थानके आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील छोट्या स्थानकांवर कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नाही; पण रोज हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या स्थानकांवरही सुरक्षा व्यवस्था नसल्याचे दिसून आले आहे. अशा स्थानकांवर मद्यपान करणारे, नशा करणाऱ्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे; तसेच, रेल्वेची मालमत्ता व परिसरातील सुरक्षा ठेवण्यासाठी ‘आरपीएफ’ गंभीर नाही, का असा प्रश्नही प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.सुरक्षा नसलेली स्थानके

पुणे रेल्वे विभागातील कामशेत, कान्हे, आकुर्डी, पिंपरी, मळवली, दापोडी, कासारवाडी, वडगाव, बेगडेवाडी, घोरावडे, मांजरी बुद्रुक, कडेठाण, खुटबाव, मलठण, उरळी, पाटस या स्थानकांवर रेल्वे सुरक्षा दलाचा एकही कर्मचारी तैनात नसतो. उरळी स्थानकावर आरपीएफ कर्मचारी दिवसातून एखादी फेरी मारतात, अशी माहिती मिळाली. या सर्व स्थानकांवरून प्रवास करणाऱ्यांचा प्रवाशांचा आकडा मोठा असतानाही ही स्थानके सुरक्षेच्या दृष्टीने दुर्लक्षित आहेत. इतर छोट्या स्थानकांच्या सुरक्षेकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. लोहमार्ग पोलिसांचेदेखील त्या ठिकाणी काहीही लक्ष नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे.आरपीएफ म्हणते, मनुष्यबळ नाही

‘आरपीएफ’च्या पुणे विभागाकडे मनुष्यबळ खूपच कमी आहे. त्यामुळे प्रत्येक स्थानकावर कर्मचारी नेमणे शक्य नाही. पुणे स्टेशन येथेच सुरक्षा देण्यासाठी कर्मचारी खूप कमी पडत आहेत, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, मनुष्यबळ वाढवण्यासाठी कोणताही पाठपुरावा केला जात नाही. इतर उद्योग करण्यासाठी आरपीएफचे कर्मचारी आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मनुष्यबळ कसे नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.

लोहमार्ग पोलिसांचे लक्ष नाही

लोहमार्ग पोलिस ठाण्याकडून देखील प्रवाशांना सुरक्षिततेची हमी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी लोहमार्ग पोलिसांकडे मनुष्यबळ चांगले आहे. पण, त्यांचे पुणे स्टेशन सोडून इतर स्थानकावर विशेष लक्ष नाही. त्या ठिकाणी किरकोळ गुन्हे घडले तरी लोहमार्ग पोलिस विशेष दखल घेत नाहीत. एखादा गंभीर गुन्हा घडल्यानंतरच त्यांचे अशा स्थानकावर लक्ष जाते. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी इतर स्थानकांवर अधूनमधून गस्त घातल्यास प्रवाशांना सुरक्षेची हमी मिळेल, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.आरपीएफ सुरक्षा नसलेली स्थानके व प्रवासी संख्या
स्थानकाचे नाव रोजची प्रवासी संख्या

कामशेत ७१६४
आकुर्डी १५,७६४
पिंपरी ११,४४५
मळवली ३,८००
दापोडी ४,९००
कासारवाडी ४,६५०
उरळी ३,८००
कान्हे १,७२०

0 9 3 8 7 1
Users Today : 7
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *