योजना एकच, नियमांत भिन्नता, दोन विभागांत समन्वय नाही, कृषिमंत्री धनंजय मुंडेंकडूनच खंत

Khozmaster
2 Min Read

नागपूर : शेततळे बांधण्यासाठी कृषिविभागाची कमाल मर्यादा केवळ ७५ हजार आहे. मात्र रोजगार हमी योजनेंतर्गत अर्ज केला तर सहा लाखांपर्यंतचा निधी प्राप्त होता. एकाच योजनेसाठी दोन विभागांत असलेली ही तफावत खुद्द कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मांडली. त्यामुळे कृषी विभागाकडे अर्ज करण्यासाठी शेतकरी उदासीन असतात अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

लातूर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मागेल त्याला शेततळे योजनेची कामे प्रलंबित असल्याचा मुद्दा काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला. लातूर जिल्ह्यात मंजूर शेततळ्यांपैकी जवळपास ६९३ शेततळ्यांची कामे अद्याप सुरू झाली नाही, असे धीरज देशमुख म्हणाले.

कृषिविभागातून शेततळे बांधण्यासाठी केवळ ७५ हजार रुपये मिळत असल्याने अनेक लाभार्थी अर्ज केल्यानंतर आपला अर्ज मागे घेतात. दोन विभागांत असलेल्या या तफावतीमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत लवकरच बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन मुंडे यांनी दिले.कोकणातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता तिथे शेततळे निर्माण करण्यासाठी अतिरिक्त निधी द्यावा, अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी केली. यावर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे मुंडे म्हणाले.महाराष्ट्रातल्या ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. रोजगार हमीच्या कामाच्या निकषात शिथिलता देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. दुष्काळात कमांड एरियातही विहिरींना परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कमांड एरियात विहिरी देण्यासंदर्भातही सरकार सकारात्मक विचार करेल आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकार ही योजना लागू करेल, असे आश्वासन मुंडे यांनी दिले.
0 9 4 6 9 6
Users Today : 46
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *