मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा घेतला. मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर काँक्रीटीकरणासह विविध पूल आणि सेवा रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणावर सुरु असल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांना त्रास होत आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक नियोजनासह सर्व उपाययोजना करण्यात याव्यात. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयानं युद्धपातळीवर काम पूर्ण करावं, असे निर्देश बैठकीत दिले. याबरोबरच ठेकेदाराकडून गतीनं काम होत नसल्यास त्याला काळ्या यादीत टाकून सक्षम ठेकेदाराला काम देण्याच्या सूचना दिल्या.
नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना मुंबईला येण्याजाण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गाच्या सुधारणेचं काम युद्धपातळीवर पूर्ण केलं पाहिजे. या मार्गावर गर्दीच्या वेळी १ लाख ७० हजार पॅसेंजर कार युनिट (PCU) एवढी वाहनं असतात. त्यामुळे काम करताना अडथळे येतात. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागानं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाशी समन्वय करुन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला रस्ते कामाच्या गतिमान कार्यवाहीत आवश्यक सहकार्य करावं, अशा सूचना दिल्या.
पावसाळ्यामध्ये रस्ते बांधकामात अडथळे येतात. ‘एमएसआरडीसी’नं रस्त्यावरील खड्यांची तातडीनं दुरुस्ती करावी, हे काम दर्जात्मक होईल याकडे लक्ष द्यावं. काँक्रीटीकरणाच्या कामावेळी वाहतूक व्यवस्था चोख ठेवल्यास अडचण येणार नाही. यादृष्टीनं आवश्यक मनुष्यबळ (वॉर्डन), बॅरिकेट्स यांची उपलब्धता करण्यात यावी. जड वाहनांना वेळेची मर्यादा घालण्यात यावी. अरुंद ठिकाणांचं मॅपिंग करावं, अशा सूचना दिल्या.
Users Today : 22