इचकेवाडीत चोरट्यांचा शेळ्यांवर डल्ला : शेतकऱ्याचे ५० हजार रुपयांचे नुकसान
कवठे येमाई दि. ०४ (प्रतिनिधी,प्रा.सुभाष शेटे) – शिरूरच्या पश्चिमेकडील कवठे येमाईच्या इचकेवाडी चौकात अष्टविनायक महामार्गालगत वास्तव्यास असणारे तरुण शेतकरी साईनाथ फक्कड इचके यांच्या बंदिस्त गोठ्यातील शेळ्यातून ३ मोठ्या शेळ्या चारचाकी व दुचाकीवरून आलेल्या ७ चोरटयांनी लांबविल्या. ही घटना आज शनिवार दि. ४ ला पहाटे दीड ते दोन च्या सुमारास घडली असून यात इचके यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. याबाबत शिरूरचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांना माहिती देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना साईनाथ इचके व त्यांचे मेव्हणे जनार्दन पऱ्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरवातीस दुचाकीवरून आलेले ३ चोरटे पहाटे दीड च्या दरम्यान काळूबाई मंदिरानजीक थांबलेले स्थानिक ग्रामस्थांनी पाहिले. त्यांना विचारले असता रस्ता चुकल्याचे त्यांनी सांगितले.लगोलग पाठीमागून वेगणार गाडी आली. त्यात चार जण होते.शंका आल्याने येथील ग्रामस्थांनी त्या दुचाकींचा कवठे गावच्या येमाई देवी चौका पर्यंत पाठलाग केला पण दुचाकीवरील ३ चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान ते ग्रामस्थ घरी परतताना त्यांना वेगनर गाडी इचकेवाडी चौकातच उभी असलेली दिसली. पण ग्रामस्थ दोघेच असल्याने ते तेथे थांबले नाही. चोरट्यांनी इचके यांच्या घराच्या बाहेरील सर्व कड्या लावल्या.व गोठ्यातील शेळ्या सोडण्यास सुरुवात केली.बोकडाचा ओरडण्याचा आवाज आल्याने साईनाथ यांच्या आई जागा झाल्या. काहीतरी गरबड होतेय हे लक्षात आल्याने त्यांनी मुलाला मोठ्याने हाक मारून उठवले. दरम्यान चोरटे ३ शेळ्या घेऊन पसार झाले. या घटनेने चोरट्यांनी पुन्हा एकदा पाळीव शेळ्यांवर डल्ला मारल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. पोलिसांनी या घटनेचा छडा लावून शेळ्या चोरांचा बंदोबदस्त करण्याची मागणी ग्रामस्थ,शेतकऱ्यातून होत आहे.
– सुभाष शेटे,९९७५६७४२८६
Users Today : 33