मातृसंस्थेचा सत्कार लेखनीला ऊर्जा देणारा : भारत सासणे

Khozmaster
3 Min Read
-अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेकडून सत्कार
ता. 17 पुणे : अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था या बाल साहित्यातील मातृसंस्थेविषयी गेल्या अनेक वर्षांपासून ऐकत आलो आहे. या संस्थेने मुलांसाठी उभारलेले कार्य पाहिले आहे. या संस्थेमुळे राज्यात अनेक बाल साहित्य चळवळी उदयाला आल्या आहेत. अशा मातृ संस्थेकडून सत्कार झाल्याचा मला विशेष आनंद आहे. हा सत्कार मला आणि माझ्या लेखनीला ऊर्जा देणारा आहे. अशी भावना बालसाहित्य अकादमी प्राप्त लेखक व ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांनी सोमवारी व्यक्त केल्या.
                भारत सासणे यांच्या ‘समशेर व भूतबंगला’ या बाल कादंबरीला साहित्य अकादमी जाहीर झाल्याबद्द अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे  त्यांच्या निवास्थानी जावून सु. वा. जोशी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, विश्‍वस्त सु. वा. जोशी, कोषाध्यक्ष संजय ऐलवाड कार्यकारिणी सदस्य श्रीकांत चौगुले, सचिन बेंडभर, छत्रपती संभाजीनगर शाखेचे उपाध्यक्ष प्रशांत गौतम, मीना सासणे आदी उपस्थित होते.
                सासणे म्हणाले, पन्नास वर्षापासून अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य  संस्था अविरत कार्य करत आहे. बाल साहित्यात आणखी खुप काम करण्याची आवश्यकता आहे. येत्या काळात या संस्थेच्या कार्यात सहभागी होण्यास मला आनंद वाटेल. चर्चासत्र, कार्यशाळा, मुलांसाठी प्रयोगशील उपक्रम आदी कार्य संयुक्तपणे करण्याची गरज आहे. बाल साहित्य आणि मुलांसाठी भरीव कार्य करण्यासाठी मी संस्थेसोबत कार्य करणार असल्याचे आश्‍वासनही सासणे यांनी दिले.
                सु. वा. जोशी म्हणाले, संस्था येत्या ऑगस्ट महिन्यात सुवर्ण महोत्सवी वर्षात पर्दापण करत आहे. महत्त्वाच्या वर्षी भारत सासणे यांच्या बाल कादंबरीला साहित्य अकादमी मिळाला आहे. सासणे हे माझे लेखक आहेत. त्यांची अनेक पुस्तके मी आजही विकत आहे. लेखकाला पुरस्कार मिळाल्याचा मला विशेष आनंद आहे. माधव राजगुरू यांनी प्रस्ताविक केले. श्रीकांत चौगुले यांनी सुत्रसंचालन केले. सचिन बेंडभर यांनी आभार मानले.
                                चौकट
                ग्रंथालयासाठी विशेष अनुदान द्यावे
                प्रत्येक शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हेच उद्याचे वाचक आहेत. मात्र शालेय स्तरावर असणारे ग्रंथालये बंद पडली आहेत. त्यामुळे मुले वाचनापासून दूर रहात आहेत. मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी शालेय स्तरावरील ग्रंथालयात बाल साहित्याची खरेदी करण्यासाठी शासनाने स्वतंत्र निधी द्यावा. या मागणीसाठी संस्थेतर्फे शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे कार्याध्यक्ष अनील कुलकर्णी यांनी सांगितले. तर या कार्यात मी संस्थेसोबत असल्याचे भारत सासणे यांनी सांगितले.
0 9 4 7 5 4
Users Today : 43
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *